आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएरंडोल - एरंडोल शहरात व ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तालुक्याचा पाणीपुरवठा हा अंजनी मध्यम प्रकल्पातील पाणीसाठय़ावर अवलंबून असल्याने नदीपात्रात पाणी सोडू नये, असे पत्राद्वारे कळविले असतानाही अंजनी धरणातून धरणगावसाठी पाणी सोडण्यात आले, यावरून एरंडोलचे नगराध्यक्ष किशोर निंबाळकर यांनी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्याशी वादावादी केली.
पाणीटंचाईचे दुर्भिक्ष पाहता अंजनी धरणातील पाणीसाठय़ावर एरंडोल व धरणगाव शहरासाठी आरक्षण टाकण्यात आले आहे. परंतु धरणगाव शहराला धावडे येथील तापी नदीवरून पाइप लाइनद्वारे पाणी उचलण्यात येत आहे. तरीही धरणगाव शहरासाठी अंजनी धरणातून नदीद्वारे पाणी सोडण्यात आले आहे. परंतु हे पाणी धरणगाव शहरासाठी आरक्षित असताना ते धरणगाव ग्रामीण भागासाठी का सोडण्यात येत आहे, असा प्रo्न उपस्थित करून नगराध्यक्षांनी पालकमंत्र्यांशी वाद घातला.
शनिवारी धरणगाव-पुणे बससेवेचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्याहस्ते झाला. धरणगावहून देवकर बसने एरंडोलपर्यंत आले. बसस्थानकात उतरल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे फटाके फोडून स्वागत याप्रसंगी केले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव देवकर बससेवेविषयी नागरिकांशी चर्चा करीत असताना शिवसेनेचे नगराध्यक्ष निंबाळकर, माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन, नगराज महाजन, नगरसेवक नितीन बिर्ला, प्रकाश महाजन आदी उपस्थित झाले. धरणगाव पालिकेच्या नगराध्यक्षांची मागणी नसताना अंजनी धरणातून पाणी का सोडण्यात आले? यावरून बराच वेळापर्यंत वादावादी झाली. त्यावेळी देवकर म्हणाले की, मी या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे मला जिल्ह्याचे हित पहावयाचे आहे, त्यावेळी नगरसेवक म्हणाले की, तुम्ही फक्त या पाण्याच्या प्रश्नासाठी पालकमंत्री नसून इतर कामांसाठी निधी घ्यायच्या वेळेस तुम्हाला एरंडोल, पारोळा मतदारसंघ दिसत नाही का? तुमची प्रतिमा फक्त धरणगावचे पालकमंत्री अशीच झाली आहे. बराच वेळ याप्रश्नांवर वादावादी चालल्यानंतर पालकमंत्री तेथून निघून गेले. या प्रo्नावरून पुन्हा एकदा पाणीप्रश्न पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. या घटनेमुळे बसस्थानक बघ्यांची गर्दी उसळली.
धरणगावला सध्या तापी नदीवरून पाणीपुरवठा सुरळीत आहे. पाण्याची टंचाई भासत नाही. पिंप्री येथील पंपिंग स्टेशनवरील मशीनही बंद केली आहे. तरी आम्हाला अंजनीच्या पाण्याची गरज नाही. याबाबतचे पत्र मी जिल्हाधिकारी यांना दिले आहे. अंजनी धरणातून पाणी सोडावे, अशी मागणी केलेली नाही. पुष्पा महाजन, नगराध्यक्ष, धरणगाव
अंजनी धरणावर एरंडोल व धरणगाव शहरासाठी पाणीपुरवठय़ाचे आरक्षण आहे. पालकमंत्र्यांनी धरणगावसाठी धरणातील पाणी नदीद्वारे पाणी सोडण्याचा अट्टाहास का केला आहे. आमचा नदीद्वारे पाणी सोडण्याला विरोध आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होऊ शकतो. त्यांनी थेट पाइप लाइनद्वारे पाणी उचलावे. किशोर निंबाळकर, नगराध्यक्ष, एरंडोल
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.