जळगाव-शहराच्या विस्ताराला र्मयादा असल्याने नागरिक घर घेताना अपार्टमेंटला प्राधान्य देत आहेत. घराबाबत चौकस असलेले जळगावकर घराच्या हक्काबाबत मात्र उदासीन असल्याचे निदर्शनास आले आहे. अपार्टमेंटमधील रहिवाशांना मालकी हक्काबाबतीत अधिक सुरक्षित करण्यासाठी शासनाने सहकार विभागामार्फत विशेष मोहीम सुरू केली आहे. दुर्दैवाने जळगावात या मोहिमेला मुळीच प्रतिसाद मिळत नसल्याची स्थिती आहे.
अपार्टमेंटमधील रहिवाशांनी ग्राहकाशी झालेल्या करारानुसार बिल्डरने गृहनिर्माण संस्था नोंदणी करून देणे आवश्यक आहे. तसे होत नसल्याचे ग्राहकांनी त्याबाबत बिल्डरकडे आग्रह धरून संस्थेची नोंदणी व अपार्टमेंटची जागा त्यांच्या नावे करण्यासाठी प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे. जिल्हा उपनिबंधक अथवा तालुका उपनिबंधकाकडे गृहनिर्माण संस्थेची नोंदणी करण्यात येते. या संस्थेची नोंदणी झाल्यानंतर बिल्डरच्या नावे असलेली अपार्टमेंटची जागा त्या संस्थेच्या सदस्यांच्या नावे करण्यात येते. त्यामुळे जागेवरील बिल्डरचा हक्क संपुष्टात येतो.
काय असतात संस्था नोंदणीचे फायदे
अपार्टमेंटच्या जागेवरील बिल्डरची मालकी संपुष्टात येऊन संस्थेची मालकी येते. भविष्यात पार्किंगची जागा विकणे, आणखी वरचा मजला बांधणे या सारख्या गोष्टी बिल्डरच्या हातात राहत नाहीत. सर्व अधिकार संस्थेकडे येत असल्याने फलॅटचे मालक अपार्टमेंटचे मालक होऊ शकतात. संस्थेच्या नोंदणीसह बिल्डिंगचा मेंटेनन्स, डेव्हलपमेंट यासारख्या गोष्टीबाबत बिल्डरशी डील करणे आवश्यक आहे.
जळगावातील गृहनिर्माण संस्था नोंदणीची स्थिती
जळगाव शहरात 3 हजारावर अपार्टमेंट आहेत. त्यापैकी केवळ 227 अपार्टमेंटमधील रहिवाशांनी गृहनिर्माण संस्थांची नोंदणी केलेली आहे. नोंदणी झालेल्या संस्थांनी जागा नावावर करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. इतर अपार्टमेंटमधील नागरिक त्या फ्लॅटचे मालक असले तरी अपार्टमेंटची मालकी मात्र बिल्डरांकडेच कायम आहे. जिल्हाभरात 730 गृहनिर्माण संस्थांची नोंदणी करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यातून एकही प्रस्ताव नाही
राज्य शासनाच्या मानीव अभिहस्तांतरण या मोहिमेत जळगाव जिल्ह्यातून एकाही गृहनिर्माण संस्थेचा प्रस्ताव आलेला नाही. अपार्टमेंटची जागा फ्लॅटधारकांच्या नावे करून देण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात त्याला मुळीच प्रतिसाद मिळत नसल्याची स्थिती आहे.