आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभुसावळ- महाजनकोच्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात सध्या कोळसा टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. राज्यभरातील वीजनिर्मिती संचांना दररोज 32 ते 35 रॅकची आवश्यकता असताना सध्या केवळ 24 रॅक मिळतात. दीपनगर औष्णिक वीज केंद्राला दररोज 5 ते 6 रॅक कोळशाची गरज असली तरी फक्त दोन रॅकवर समाधान मानावे लागते. यामुळे औष्णिक वीजनिर्मितीवर परिणाम झाला आहे.
दीपनगर केंद्रातील लोहमार्ग कालबाह्य झाल्याचे तसेच भुसावळ जंक्शनच्या यार्डातून वाहतूक थांबवून रॅक पुरविणे जिकरीचे होत असल्याचे कारण यासाठी पुढे करण्यात आले. प्रत्यक्षात मात्र कोल कंपन्यांकडूनच महाजनको कंपनीस कोळशाचा पुरवठा पूर्णपणे होत नाही. दीपनगर केंद्रातील चारपैकी संच एक आणि दोन केवळ कोळशाच्या तुटवड्यामुळे वेळोवेळी बंद ठेवण्यात येतात. मिळणारा कोळसा कमी उष्मांकाचा असल्याने वीजनिर्मितीचा खर्च वाढतो. परिणामी प्रदूषणात वाढ होते.
गेल्या वर्षी महाजनको कंपनीला नियमित कोळशाच्या पटीत केवळ 75 टक्के कोळसा मिळाला होता. दीपनगर केंद्रातील चारही संचांसाठी दररोज 11 हजार मेट्रीक टन कोळशाची आवश्यकता असताना सध्या केवळ 6 ते 7 हजार मेट्रीक टन कोळसा मिळतो. दोन वर्षांपूर्वी दीपनगर केंद्रात महिनाभर पुरेल एवढा कोळसा साठवण्यात येत होता. सध्या केवळ दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच साठा असतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.