जळगाव- मू.जे.महाविद्यालयपरिसरातील समर्थ कॉलनी भागात गुरुवारी काही वेळ दूषित पाणीपुरवठा झाला. याबाबत नागरिकांच्या तक्रारीवरून पालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली असता, जलवाहिनी कुठेही फुटलेली आढळून आली नाही. त्यामुळे पाणीपुरवठा विभागातर्फे शुक्रवारी पुन्हा या भागात पाहणी करण्यात येणार आहे.
समर्थ कॉलनी परिसरात गुरुवारी सकाळी पाणीपुरवठ्याचा दिवस होता. मात्र, सुरुवातीला नळांतून लाल रंगाच्या अळ्या आणि मातीमिश्रित दूषित पाणीपुरवठा झाल्याची नागरिकांची तक्रार आहे. याबाबत नागरिकांनी या भागातील नगरसेवक रवींद्र पाटील यांच्याकडे तक्रारी केल्या. त्यामुळे त्यांनी पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी उपअभियंता सुनील भोळे कनिष्ठ अभियंता आर.टी.पाटील यांना माहिती दिली. त्यानंतर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, जलवाहिनी कुठेही फुटलेली आढळून आली नाही. सुरुवातीला काही प्रमाणात दूषित पाणीपुरवठा झाला. मात्र, नंतर दूषित पाणीपुरवठा झाला नसल्याचा दावा पालिका अधिका-यांनी केला आहे.
नळांना दूषित पाणी आल्यामुळे नगरसेवक रवींद्र पाटील यांनी नागरिकांच्या घरी पाण्याचे जार पोहोचवले.
समर्थ कॉलनी परिसरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यावर तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मात्र, जलवाहिनी कुठेही फुटलेली आढळून आली नाही. सुरुवातीला जलवाहिनीत साचलेले खराब झालेले पाणी आले असेल. तथापि, शुक्रवारी पुन्हा या भागात पाहणी करणार आहे. एस.टी.पाटील,
नगरसेवकाकडून शुद्ध पाणीवाटप
अळ्यांयुक्तपाणीपुरवठा झाल्यावर नागरिकांकडून नगरसेवक रवींद्र पाटील यांच्याकडे तक्रार केली. हे पाणी कसे पिणार? असा प्रश्न उपस्थित केल्यावर पाटील यांनी स्वखर्चातून शुद्ध पाण्याचे जार नागरिकांना दिले. तसेच पालिकेकडून दूषित पाण्याची समस्या दूर होईपर्यंत या भागातील नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करणार असल्याचे त्यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.