आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभुसावळ- राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी भुसावळसह मुक्ताईनगर तालुक्यात जमिनीची मोजणी करण्यात आली. राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी 9 लाख 77 हजार 383 चौरस मीटर जमीन संपादित केली जाणार आहे. यामुळे संबंधित जागा मालकांनी शासनाकडे मोठय़ा प्रमाणावर हरकती दाखल केल्या. 20 दिवसांच्या काळात भुसावळ आणि मुक्ताईनगर तालुक्यातून 708 हरकतींचा पाऊस प्रांताधिकारी कार्यालयात पडला. यामुळे महामार्गाच्या चौपदरीकरणापूर्वीच्या प्रक्रियेचा तिढा वाढला आहे.
राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याने शासनस्तरावर रस्त्याचे मोजमाप करण्यात आले आहे. 19 डिसेंबर 2012 या दिवशी शासनाकडून अधिसूचना जाहीर झाल्याने जागा मालकांनी हरकती घेतल्या आहेत. 10 जानेवारीपर्यंत दावे स्वीकारण्याची अंतिम मुदत होती. दोन्ही तालुक्यातील जमीन मालकांनी वकिलांच्या माध्यमातून दावे दाखल केले आहेत. चौपदरीकरणासाठी संपादित होणारी जमीन बागायती आहे. कपाशी, मका, केळी यासारखी पिके घेतली जात असून शेतात पक्की विहीर असल्यामुळे जमीन संपादित केली जाऊ नये, अशा प्रकारच्या हरकती नोंदवण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय महामार्गालगत जमीन असल्याने व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या जमिनीसाठी काही जमीन मालकांनी 60 ते 70 हजार चौरस मिटरनुसार दराची मागणी केली आहे. राष्ट्रीय महामार्गासाठी लागणार्या जमिनीच्या पार्श्वभूमीवर या मार्गावरील सुमारे दोन हजार वृक्षांची कत्तल केली जाणार आहे. त्यामुळे भविष्यात प्रदूषणाचा प्रश्न आणखी गंभीर होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
प्रांताधिकारी कार्यालयातील कर्मचारी दाव्यांचा अभ्यास करून त्यांची संगणकीय नोंदणी करत आहेत. सर्व दाव्यांचा अभ्यास झाल्यावर मुक्ताईनगर तालुक्यातील सुनावणी 13 व 14 फेब्रुवारीला तर भुसावळ तालुक्यातील दाखल दाव्यांवरील सुनावणी 27 व 28 फेब्रुवारीला होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.