जळगाव - माजी मंत्री सुरेश जैन यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केल्याप्रकरणी अण्णा हजारेंविरुद्ध दाखल बदनामी खटल्याचे कामकाज बुधवारी झाले. आजारपणामुळे जळगाव न्यायालयात हजर राहणे शक्य नसल्याने आयुक्त नेमून कारागृहातच साक्ष नोंदवावी, असा अर्ज सुरेश जैन यांच्या वतीने सादर करण्यात आला आहे. जैन सध्या घरकुल घोटाळाप्रकरणी धुळ्याच्या कारागृहात आहेत.
युती सरकारच्या काळात सुरेश जैन मंत्री असताना अण्णा हजारे यांनी जैन यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यामुळे जैन यांनी हजारेंच्या विरोधात जळगाव व मुंबईला बदनामीचा खटला दाखल केला होता. हे दोन्ही खटले आता जळगाव न्यायालयात एकत्रित चालवले जात आहेत. जैन यांची नव्याने साक्ष नोंदवण्यासाठी हजारेंच्या वतीने अर्ज करण्यात आला आहे. मात्र, जैन सुनावणीला येत नसल्याने खटल्याचे काम प्रलंबित आहे.