आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव - दुष्काळी स्थितीत पाण्याची नासाडी करणार्यांची हयगय न करता त्यांच्यावर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी जलदिनाच्या पूर्वसंध्येला ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिला. यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, मुख्याधिकार्यांना आदेश देण्यात येणार आहेत. दुष्काळी परिस्थितीत कुणालाच रजा मिळणार नसून कर्तव्यात टाळाटाळ करणार्या अधिकारी व कर्मचार्यांवरही शिस्तभंगाचा दंडुका चालवला जाईल.
जिल्हाधिकारी म्हणाले की, होळीच्या दिवसात नागरी भागांमध्ये सामूहिक धूलिवंदनाचे कार्यक्रम होत असल्याने मोठय़ा प्रमाणावर पाण्याची नासाडी होते, या नासाडीला लगाम घालण्यासाठी सामूहिक पाण्याची नासाडी करणार्यांवर गुन्हे नोंदवण्यात येतील. टँकरची गळती, पाइपलाइनच्या गळतीवर तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना आहेत, टाळाटाळ करणार्यांवर कारवाई करण्यात येईल. ग्रामीण भागात धरणातून पाणी उचलणार्यांवरही गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरूच राहील. त्यात कुचराई करणार्यांवर कारवाई होईल.
नागरिकांचा प्रतिसाद नाही
पाण्याचे व्यवस्थापन, जलसाक्षरता आणि जागरूकता या गोष्टींचा अभाव असल्याने सक्तीची काटकसर करावी लागत आहे. आवाहन करूनही नागरिकांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याची खंत राजूरकर यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळेच थेट कारवाईसारखे कठोर पाऊल उचलण्याशिवाय प्रशासनापुढे गत्यंतर उरलेले नाही.
जागतिक जलदिनानिमित्त जलबचतीचा संदेश आणि जनजागृतीसाठी शुक्रवारी शहरातून रॅली आणि ‘दिव्य जलरथा’चे आयोजन केले आहे. जीएस ग्राऊंडवर ‘भूजल पुनर्भरण अभियान’ याविषयावर चित्रप्रदर्शनही भरविण्यात येणार आहे.
‘दिव्य मराठी’, रोटरी क्लब, भवरलाल अँण्ड कांताबाई जैन मल्टिपर्पज फाउंडेशन, संघवी पाइप, मराठी विज्ञान परिषद, पंकज टीव्हीएस यांच्यातर्फे जागतिक जलदिनानिमित्त शुक्रवारी विविध कार्यक्रम होणार आहेत.
दुष्काळामुळे शहरात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे; अशा परिस्थितीत पाण्याचा मुबलक वापर करणे हा मुख्य उद्देश लक्षात घेऊन सकाळी 7 वाजता शहराच्या प्रमुख मार्गावरून जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ जीएस ग्राऊंड येथे उद्योगपती रतनलाल बाफना यांच्या हस्ते होईल. यात ‘पाणी वाचवू जीवन वाचवू’, ‘पाणी मुक्त धुळवड साजरी करू’ यावर जनजागृती केली जाईल. जीएस ग्राऊंडवर ‘भूजल पुनर्भरण अभियान’ या विषयावर चित्रप्रदर्शन भरविण्यात येणार आहे. याचे नियोजन रोटरी क्लब व कंवरलाल संघवी यांनी केले आहे. जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांच्या हस्ते सकाळी 9.30 वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. सामाजिक कार्यकर्ते दलिचंद जैन प्रमुख पाहुणे असतील. यात पाणी बचतीसह रूफ वॉटर हार्वेस्टिंगची माहिती देणारी पोस्टर असतील. ज्युनिअर अमिताभ बच्चन या जलरथाचे आकर्षण असतील. जलरथ हा दिवसभर विविध प्रभागांमध्ये फिरून जनजागृती करेल. यात ‘दिव्य मराठी’च्या अभियानांतर्गत ‘पाणी वाचवू’चे स्टीकर वाटप केले जातील. कंवरलाल संघवी यांनी तयार केलेले ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ व मराठी विज्ञान परिषदेतर्फे ‘पाणी वाचवा’ या विषयावरील माहिती पत्रके वाटप होईल.
सहभागी होण्याचे आवाहन
जलदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये सामाजिक संस्था, महिला संघटना, विद्यार्थी, युवक, राजकीय नेते, पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, जल अभ्यासक व शहरवासीयांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.