आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: शहरामध्ये राेज निम्मा पाणीपुरवठा फुकटात, 205 दशलक्ष लिटर पाण्याचा बेहिशेबी पुरवठा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिका क्षेत्रात अर्थातच नाशिक शहरात दरराेज २०५ दशलक्ष लिटर पाणी फुकटात पुरवले जात असल्याची धक्कादायक वास्तव जललेखापरीक्षण (वाॅटर अाॅडिट) मधून उघडकीस अाले असून सर्वाधिक पाणी गळती सिडकाे व उच्चभ्रूंची वस्ती मानल्या जाणाऱ्या नाशिक पश्चिम विभागात अाहे. गळती कमी करण्यासाठी चक्क २४ तास पाणीपुरवठा करण्याचाही सल्ला देण्यात अाला असून, २४ तास पाणी दिल्यास साठवणुकीच्या नादात हाेणारा अपव्यय टळेल असाही दावा करण्यात अाला अाहे.

 

महापालिका क्षेत्रात दरराेज ४१० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जाताे. प्रामुख्याने त्यातील २०५ दशलक्ष लिटर पाण्याचा हिशेबच नसल्याचे आढळून अाले अाहे. पालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेवर होणारा खर्च आणि पाणीपट्टीतून मिळणारा प्रत्यक्ष महसूल यात कोट्यवधींची तफावत असल्याने एन. जे. एस. इंजिनिअर्स (इंडिया) प्रा. लि. या कंपनीमार्फत वॉटर ऑडिट करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. १९ सप्टेंबर २०१७ रोजी प्राथमिक अहवाल व त्यानंतर दुरुस्तीसह अहवाल गुरुवारी आयुक्त कृष्णा यांना सादर केला. लेखापरीक्षणात पालिका क्षेत्रातील २१०० कि. मी. लांबीच्या जलवाहिन्या जीएसआय लिंक केल्या असून प्रत्येक विभागातील दोन याप्रमाणे सहाही विभागातील १२ जलकुंभांचा अभ्यास केला. २० टक्के नळजोडणीधारकांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यात अाले.

 

अशी पाणी गळती : दररोज ४१० दशलक्ष लिटर पाण्यापैकी चार टक्के पाण्याची गळती ही पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रांत, मनपा मिळकती, उद्याने या माध्यमातून तीन टक्के तर जलवाहिन्यांमधून १४ टक्के गळती होत असल्याचे समोर आले आहे. ही बाब आणि पाणीपट्टीतील थकबाकी लक्षात घेता ४५ टक्के पाण्याचेच बिलिंग होत असल्याचे स्पष्ट होते.

 

पालिकाच उदासीन : जलशुद्धीकरण केंद्रे, जलवाहिन्यांमधून गळती, मनपाच्या मिळकतीवरील पाणीवापर, नादुरुस्त पाणी मीटर अथवा मीटर नसल्यामुळे होणारी सरासरी बिल आकारणी याकडे दुर्लक्ष होत आहे.

 

२४ तास पाणीपुरवठा हा उपाय : पाणीगळती रोखण्यासाठी ६०० काेटी खर्चून तीन टप्प्यांत समस्येचे निराकरण हाेईल. त्यात संपूर्ण शहरात २४ तास पाणीपुरवठा सुरू केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात जुन्या जलवाहिन्या बदलणे, जलवाहिन्यांवरील व्हॉल्व्ह बदलणे, जलशुद्धीकरण केंद्रातील गळती बंद करणे, स्मार्ट मीटरसाठी स्काडा प्रणालीचा अवलंब करावा लागेल. प्रायोगिक तत्त्वावर शहरातील दोन भागात (पहिल्या टप्प्यात महात्मानगर व बडदेनगर) तर स्मार्ट सिटी अभियानांतर्गत गावठाण भागात (पंचवटी) २४ तास पाणीपुरवठा करावा लागेल. दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक विभागात जलकुंभनिहाय दोन ते तीन याप्रमाणे संपूर्ण शहरात १८ ते २० झोन तयार करावे लागतील. येथे २४ तास पाणीपुरवठा सुरू करून पालिका पुढील पाऊल टाकेल. तिसऱ्या टप्प्यात आवश्यकतेनुसार जलकुंभांची उभारणी करून संपूर्ण शहरात ४ तास पाणीपुरवठा करण्याचा सल्ला दिला अाहे.

बातम्या आणखी आहेत...