आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नाशिक - आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर आणि प्र-कुलगुरू डॉ. शेखर राजदेरकर यांच्यात वर्षभरापासून सुरू असलेली खदखद आता प्र-कुलगुरू यांच्या आजारपणाच्या रजेनंतर रुजू होण्याच्या मुद्यावरून समोर आली आहे. डॉ. जामकर हे डॉ. राजदेरकरांना आताच रुजू करून घेण्यास उत्सुक नसल्याने दोघांमध्ये शीतयुद्ध रंगल्याची चर्चा विद्यापीठ वतरुळात सुरू झाल्याने विद्यापीठातही राजकारणाचा शिरकाव सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
नाशिकमधील दोन्ही विद्यापीठे आता अंतर्गत राजकारणाने बर्यापैकी चर्चेत आली असून, डॉ. कृष्णकुमारांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या कुलगुरूपदाच्या जागेवरून तेथे मोठय़ा प्रमाणावर राजकारण सुरू झाले आहे. त्यातच डिसेंबर महिन्यात डॉ. शेखर राजदेरकरांच्या झालेल्या अपघातानंतर आरोग्य विज्ञान विद्यापीठाचेही राजकारण समोर येऊ लागले आहे.
डॉ. राजदेरकरांना अपघातात पायाला दुखापत झाली. त्यावर त्यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रियाही झाली आहे. त्यांना रुग्णालयातून महिनाभरापूर्वीच डिस्चार्जही देण्यात आला आहे. डॉक्टरांनीही वॉकर घेऊन चालण्यास हरकत नसल्याचे सांगितले असूनही ते का रुजू होत नाही? याबाबत आता विद्यापीठात चर्चा रंगली आहे. दोन्ही कुलगुरूंमधील मतभेदच त्यास कारणीभूत असल्याचे कारण यातून समोर आल्याने आता हा मुद्दा अधिकच वाढण्याची शक्यताही वाढली आही. परंतू असे असताना आपल्या वैयक्तिक हेव्या-दाव्यांमुळे विद्यापीठाचे मोठे नुकसान होऊ नये अशीही मते येथील अधिकार्यांकडून खासगीत व्यक्त केली जात आहे.
विविध बैठकांमध्येही कनिष्ठ अधिकारी अथवा सहकार्यांसमोरही हे लपून राहिले नसल्याने आता हे प्रकरण विद्यापीठात अधिकच चवीने चघळले जात आहे. विशेष म्हणजे प्रति कुलगुरु हा व्यवस्थापन समितीचा सभासद नसतो. असे असतानाही प्रति कुलगुरुपदाचा प्रभारी कार्यभार व्यवस्थापन समितीचे (मॅनेजमेंट कौन्सिलचे) सभासद असलेल्या महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस चे प्राध्यापक डॉ. नितीन गंगणे यांच्याकडे कसा देण्यात आला हाही प्रश्न या निमित्ताने उभा राहिला आहे.
मात्र कुलगुरु डॉ. जामकरांनी ते अद्याप पूर्णपणे तंदूरुस्त नसून, ते तंदूरुस्त झाल्यानंतर रुजू करुन घेण्यास हरकत नसल्याचे कारण पुढे केले आहे. तर डॉ. राजदेरकरांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी रुजू होणार असल्याचे सांगत या प्रकरणावर पांघरुन घालण्याचा प्रयत्न केला.
राज्यपालांच्या आदेशानेच कार्यवाही
त्यांच्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे त्यांना नीट उभे राहता येत नाही. शिवाय विद्यापीठात आयएसओचे कामकाज सुरु असल्याने त्यांचीही धावपळ होऊ नये. त्यामुळे त्यांचा पदभार राज्यपालांच्या आदेशानेच डॉ. नितीन गंगणे यांच्याकडे दिला आहे. ते तंदूरुस्त होताच ते रुजू होऊ शकतील. त्यांच्याकडे तक्रार निवारण समितीची 34 प्रकरणे प्रलंबित होती त्यापैकी 16 प्रकरणे आम्ही नागपूरच्या बैठकीत निकाली काढली आहे. डॉ. अरुण जामकर, कुलगुरु
मला डिस्चार्ज देऊन जवळपास दीड महिना झाला आहे. आता पाय ठीक आहे. त्यामुळे माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच मी रुजू होईल. परंतू त्यांनी मला वॉकर घेऊन चालण्यास परवानगी दिली आहे. शिवाय कामही बैठे स्वरुपाचेच असल्याने रुजू होण्यास हरकत नसल्याचे सांगितले आहे. केवळ प्रमाणपत्र बाकी आहे. ते मिळताच त्यांच्या सल्ल्याने मी रुजू होईल. डॉ. शेखर राजदेरकर, प्रति कुलगुरु आरोग्य विज्ञान विद्यापीठ
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.