नाशिक- तुलसी
विवाहानंतर जोडीदाराच्या शोधात असणा-या दांपत्यांना शास्त्रानुसार विवाहासाठी 'ग्रीन सिग्नल' मिळाला आहे. नोव्हेंबरमध्ये 28 तारखेचा एकमेव विवाह मुहूर्त असून, डिसेंबरमध्ये मात्र नऊ मुहूर्त आहेत. शास्त्राप्रमाणे सिंहस्थकाळात विवाह करता येणार नसल्याच्या समजाने विवाहोत्सुक वधू-वरांसह त्यांचे कुटुंबीय धास्तावलेले असताना, सिंहस्थ पर्वणी काळ वगळता अन्य दिवशी मुहूर्तांवर विवाह करता येतील, असे शहरातील नामवंत ज्योतिषांनी स्पष्ट केले आहे.
हिंदू धर्मशास्त्रानुसार तुलसी विवाहानंतर लग्नसोहळे सुरू होतात. मंगळवारी तुलसी विवाह समारंभ झाल्यानंतर आता विवाहेच्छुक मुला-मुलींच्या लग्नासाठी कुटुंबीयांची घाई सुरू झाली आहे. अर्थात, सामाजिक परिस्थितीमुळे सध्या विवाह जुळविण्याचे समीकरणच बदलले आहे. मुलींच्या घटलेल्या प्रमाणामुळे मुलांना वधू मिळणे कठीण होत आहे. त्यामुळे मागील लग्नसराई संपल्यावरही काही पालकांनी
आपल्या मुलासाठी वधू पसंत केली असून, विवाहाचे ठरावही केले आहेत. बहुतेकांनी आधीच मुहूर्त पाहून लग्नाचा दिवस ठरविला आहे. आता तुलसी विवाह होताच ठरलेल्या मुहूर्तावर हे शुभविवाह होणार आहेत. नोव्हेंबर आणि डिसेंबरमधील मुहूर्तांवर सर्वच मंगल कार्यालयांची आगाऊ नोंदणी झाली आहे. त्यामुळे यापुढे लग्न ठरणाऱ्यांना मंगल कार्यालयांबाबत ह्यअॅडजेस्टमेंटह्ण करावी लागेल किंवा नाशिकबाहेर विवाह सोहळे करावे लागतील.
सन 2015 मध्ये कुंभमेळ्याला सुरुवात होत आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार हा कालावधी विवाहास उचित मानला जात नाही, असा समज आहे. त्यामुळे सिंहस्थ काळाचे वर्ष गेल्यास वय वाढून त्यापुढे मनाजोगते स्थळ मिळेल का, असा यक्षप्रश्न अनेक पालकांना पडला आहे. याविषयी ह्यदिव्य मराठीह्णने काही ज्योतिष तज्ज्ञांशी चर्चा केली असता सिंहस्थ काळात विवाह सोहळे करू नयेत, असा उल्लेख कोणत्याही धर्मग्रंथात नसल्याचे त्यांनी सांगितले.
सिंहस्थ पर्वणीच्या दिवशी विवाह टाळावेत
सिंहस्थ काळात पूर्वीही गर्दी होत असे. शहरात सोयी-सुविधा मिळत नसत. त्यामुळे सिंहस्थ काळात शहरात विवाह समारंभ टाळण्याची प्रथा रूढ झाली. पुढे त्याला धर्मशास्त्राचा आधार दिला गेला. प्रत्यक्षात धर्मशास्त्रात या काळात विवाह समारंभ करता येणार नसल्याचे म्हटलेले नाही. पर्वणीच्या दिवशी मात्र विवाह समारंभ टाळावेत. सचिन पाडेकर, ज्योतिषतज्ज्ञ