आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Ex MLA AT Pawar Book Aadiwashincha Vikassurya Publish

आदिवासी कल्याणासाठी जीवनभर संघर्षरत ‘एटी’

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमदार ए. टी. पवार यांच्या कार्याचा आढावा घेणारे अभिमन्यू सूर्यवंशी लिखित ‘आदिवासींचा विकाससूर्य’ या पुस्तकाचे प्रकाशन माजी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते बुधवारी (दि. 30) सायंकाळी 6 वाजता कुसुमाग्रज स्मारकात होणार आहे. यानिमित्त पुस्तकातील संपादित अंश..


वयाच्या 34व्या वर्षी एटी आमदार झाले. मतदारसंघातील प्रत्येक गावाला त्यांनी भेट दिली. तेथील समस्या समजावून घेतल्या. सगळं लक्ष विकासकामांकडे वळवलं. शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाझर तलाव, आर्शमशाळा, पाणीपुरवठा योजना यांचा अभ्यास केला. टिपणं तयार केली. नदीनाले-डोंगर-पठार-जमिनीचा उंचसखलपणा, केम आणि सापुतार्‍यातून वाहणार्‍या नद्या, त्यांच्या प्रवाहांची पाहणी केली. मोठी जलसंपत्ती असतानाही उन्हाळ्यात पाड्यांना पिण्यासाठी पुरेसं पाणी मिळत नव्हतं. सर्वत्र डोंगराळ प्रदेश असल्यानं पाणी अडवलं जात नव्हतं. इथे धरण झालं तर सुरगाणा तालुक्याबरोबरच गिरणा खोर्‍यातीलही सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल, असा त्यांना विश्वास होता.

कळवणचीही हीच गोष्ट होती. मग सिंचनाचा अनुशेष भरण्यासाठी त्यांनी पाझर तलाव, पाटबंधारे योजना कुठे घेता येतील याची प्रत्यक्ष पाहणी सुरू केली. आमदार झाल्यावर त्यांनी पूनद धरणाची मागणी केली.

सरकार दरबारी मागण्या मांडायला सुरुवात केली. त्यांचा कामाचा धडाका बघितल्यावर तत्कालीन पाटबंधारेमंत्री वसंतदादा पाटील त्यांना म्हणाले, ‘एटी, एका पंचवार्षिक योजनेमध्ये सर्व कामं उरकायचा विचार दिसतो तुमचा! पण सरकारच्या तिजोरीत पैसा आहे की नाही, आणि एकाच मतदारसंघाची किती कामं करावयाची याला काही र्मयादा असतात, हे विसरलात वाटतं?’ एटी म्हणाले, ‘मी आदिवासी माणूस साहेब. मला काय माहीत सरकारच्या तिजोरीत किती पैसा आहे ते? आम्ही वर्षानुवर्षे उपाशी. आमच्या भुकेचा विचार करा. सर्वसामान्यांना जो मापदंड लावता तो आम्हाला लावू नका.’ आणि त्यांनी अक्षरश: हात जोडले. वसंतदादांसारखा अनुभवी माणूस त्यांच्याकडे क्षणभर पाहत राहिला.