सिडको - भंगार बाजारातील अतिक्रमण निर्मूलन मोहिमेदरम्यान ७०० पेक्षा जास्त दुकानांवर हातोडा चालविला गेला. यात माेठ्या प्रमाणात स्क्रॅप मटेरियल निघाल्याने हे मटेरियल सातपूर येथे टाकण्यात येणार असल्याचे पालिकेतर्फे सांगण्यात येत होते. मात्र, न्यायालयानेच हे स्क्रॅप मटेरियल शहराबाहेर टाकण्याचे आदेश दिले आहेत. हे मटेरियल पोलिस महापालिका प्रशासन यांच्या मदतीने शहराबाहेर हटवावे, असेही आदेश दिले असल्याची माहिती माजी सभागृह नेते दिलीप दातीर यांनी दिली.
भंगार बाजार अतिक्रमण हटविण्याला स्थगिती मिळावी. यासाठी भंगार व्यावसायिकांनी २३ डिसेंबरला याचिका दाखल केली होती. सोमवारी याबाबत फेरसुनावणी होती. मात्र, जवळपास संपूर्ण बाजार हटविला गेल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याने याचिकाकर्ते तोंडघशी पडले. न्यायालयाने भंगार बाजाराचे अतिक्रमण हटविले गेले आहे. त्याचे स्क्रॅप मटेरियल हे शहराबाहेर हटविण्याचे आदेश दिले. शिवाय त्याचा कुठेही स्टॉक करता येणार नाही असेही सांगितले.
हे मटेरिअल शहराबाहेर नेताना पोलिस पालिका प्रशासन यांना सांगूनच किंवा यांच्या संमतीनेच बाहेर न्यावे असेही सांगितल्याची माहिती माजी सभागृह नेते दिलीप दातीर यांनी दिली. शिवाय दिलीप दातीर यांनी जनहित याचिका दाखल केली होती, तिच्यावरही समाधान व्यक्त करीत मोहीम यशस्वी झाली.
नाशिक शहरातील सर्वात मोठ्या भंगार बाजारातील अतिक्रमण निर्मूलन माेहिमेच्या तिसऱ्या दिवशी साेमवारी छोट्या-मोठ्या तब्बल ७०० अतिक्रमित दुकानांवर हातोडा चालविण्यात आला. किरकोळ वाद वगळता मोहीम शांततेत पार पडली. पोलिसांच्या सूक्ष्म नियोजनामुळे मोहीम यशस्वी झाल्याचे दिसून आले. सर्वच अतिक्रमण पाडले गेले अाहे. मात्र, यानंतर येथे पडलेले साहित्य हलविण्यासाठी दिवस लागण्याची शक्यता अाहे.
अंबड भंगार बाजारातील खाडी संजीवनगर भाग संवेदनशील होता. त्यामुळे या संपूर्ण भागाला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. शिवाय अंबड-सातपूर लिंकरोड वाहतूक बंद केल्याने संपूर्ण रस्त्यांवरही पोलिसांचा खडा पहारा होता. अनेक भंगारविक्रेत्यांनी वाद घालत अतिक्रमण मोहिमेत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तो हाणून पाडला. संजीवनगर भागात पोलिसांना अरेरावी करणाऱ्या भंगार व्यावसायिकांना चोप दिला. याच भागात गर्दी जमवून वाद घालणाऱ्यांवर किरकोळ लाठीचार्ज करण्यात आला. त्यामुळे गर्दी पांगली अतिक्रमण मोहीम पुन्हा सुरळीत सुरु झाली. सकाळी ते सायंकाळी पर्यंत मोहीम सुरूच होती.
आगलावल्याप्रकरणी दाेघांवर गुन्हा :अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत व्यत्यय आणण्यासाठी दोन व्यावसायिकांनी दुकानांना आग लावली. अग्निशामक दलाने तत्काळ आग आटोक्यात अाणल्याने अनर्थ टळला. याप्रकरणी संशयित बेमुल्ला गफार चौधरी हरुण सहना खान यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यावर अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अाहे.
न्यायालयाच्या आदेशाने समाधान
^न्यायालयाने योग्य निकाल दिला. मी दाखल केलेली जनहित याचिका बंद केली. आतापर्यंतची लढाई यशस्वी झाली. शिवाय स्क्रॅप मटेरियल बाहेर हटविण्याच्या आदेशाने नाशिककरांच्या आरोग्याचा प्रश्न मिटला. -दिलीप दातीर, याचिकाकर्ते.