नाशिक - एकीकडे विधानसभेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीचे तळ्यात-मळ्यात सुरू असताना, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मात्र स्वत:साठी सुरक्षित मतदारसंघ शोधण्याची धडपड करत आहेत. राज्यातील काँग्रेसमधील दिग्गज मंत्र्यांनी सध्या राष्ट्रवादीबरोबर वाटाघाटीला सुरुवात केली असून, मुख्यमंत्र्यांना कशाप्रकारे निवडून आणता येईल, यासाठीचे नियोजन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री चव्हाण यांनी "नाशिक मध्य’मधून निवडणूक लढवावी, यासाठी अल्पसंख्याक विभागासह शहर काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
मोदी लाटेनंतर काँग्रेसची नौका पार करण्यासाठी पक्षासमोर जनमानसात चांगली प्रतिमा असणारे पृथ्वीराज चव्हाण हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे. स्वच्छ कारभार, जनमानसातील प्रतिमा या जमेच्या बाजू असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी निवडणूक लढण्यास नकार देऊ नये, अशी वरिष्ठ नेत्यांची इच्छा आहे. तसेच, मुख्यमंत्री चव्हाण निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास त्यांना पराभवाचा सामना करावा लागू नये म्हणून फिल्डिंग लावण्यासदेखील सुरुवात झाली असून, योग्य मतदारसंघ शोधण्याच्या मोहिमेने जोर पकडला आहे.
चव्हाण यांनी पक्षाध्यक्षांकडे दक्षिण कराडमधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. दक्षिण कराड मतदारसंघ काँग्रेससाठी राज्यातील सर्वात सुरक्षित मतदारसंघांपैकी एक आहे. मात्र, मागील अनेक वर्षांपासून या मतदारसंघामधून निवडून येणाऱ्या काँग्रेसच्या विलासकाका पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या मागणीचा जोरदार शब्दांत विरोध केला आहे. पाटील यांनी दक्षिण कराडची जागा
आपल्याशिवाय अन्य कोणाला दिल्यास आपण याच जागेवर अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे पक्षाला सांगितले आहे. यानंतर शहरातील विधानसभा क्रमांक १२४ अर्थात "नाशिक मध्य’ मतदारसंघ गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या ताब्यात असून, गेल्या विधानसभेत तो मनसेच्या वाट्याला गेला होता. हा मतदारसंघ अल्पसंख्याकबहुल असल्यामुळे सुरक्षित आहे. म्हणून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथून निवडणूक लढवावी, असे आग्रही साकडे अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष अयाज काझी यांनी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना घातले आहे.