पुणे - ‘दुष्काळी भागाचे दु:ख दूर करण्याचे किती जरी मनात आणले तरी सरकार ते करू शकत नाही. यासाठी समाजानेच पुढाकार घ्यावा लागतो,’ असे मत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी साेमवारी पुण्यात व्यक्त केले.
अभिनेता नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या ‘नाम’ संस्थेस ‘अभिजितदादा कदम मानवता पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. फाउंडेशनचे अध्यक्ष माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम, विश्वस्त डॉ. विश्वजित कदम आदी या वेळी उपस्थित होते. राणे म्हणाले, ‘सरकारला उत्पन्नवाढीसाठी कर वाढवता येत नाहीत. सरकार कोणाचेही असले तरी सरकारमध्ये कामाला मर्यादा असतात. गरिबी, दारिद्र्य, अज्ञान अशा अनेक संकटांचा सामना करण्यासाठी ‘नाम’सारख्या संस्थांची गरज आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना भेटी दिल्या तेव्हा मन हेलावून गेले. त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवे असे वाटले. पण सगळ्या गोष्टींना सरकार पुरे पडत नाही.’
अनासपुरे म्हणाले, ‘मी मूळचा ‘भारता’तला माणूस. आता ‘इंडिया’त राहतो. शूटिंग नसतानाच्या रिकाम्या वेळेत समाजात फिरता येते. माणसांना वाचता येते. देदीप्यमान इतिहास असणाऱ्या देशाचा वर्तमानकाळ इतका केविलवाणा का? विविध ठिकाणांहून विक्री किंवा प्रसिद्धीसाठी हिंदी- इंग्रजीतून फोन येतात. या फोनना मराठीतूनच उत्तर द्या. यामुळे मराठी मुलांना नोकऱ्या मिळतील. आजच्या मराठी दिनाच्या मुहूर्तावर हे जरूर करा,’ असे आवाहनही अनासपुरे यांनी केले.
शहिदांसाठीही आता ‘नाम’
स्वत:हून सीमेवर प्राणार्पण करणाऱ्या जवानांचे कुटुंब आपले आहे. पुढच्या महिन्यात ‘नाम फाउंडेशन’ शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत देण्यासाठी मोठा कार्यक्रम घेणार आहे, असे सांगतानाच ‘नाम’ ही संस्था फक्त पाटेकर- अनासपुरेंची नाही. समाजातल्या प्रत्येकाची आहे, असे मकरंद अनासपुरे म्हणाले.
आमचे काम स्वार्थासाठी
‘नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांचे काम आणि आमच्या कामात फरक आहे. लोकप्रियता वाढावी, लोकांचा विश्वास वाढावा, त्यांनी आम्हाला निवडून द्यावे आणि मग आम्ही कोणीतरी बनावे म्हणून आम्ही लोकांची कामे करतो. पण कोणत्याही पदासाठी, राजकारणासाठी नाना-अनासपुरे काम करत नाहीत. राष्ट्रीय एकात्मतेसाठी ते काम करतात. हा त्यांच्यातला आणि आमच्यातला फरक आहे.’
– नारायण राणे, माजी मुख्यमंत्री.