पुणे - केवळ रस्ते बांधणीच्या कामांना गती देऊन येत्या दोन वर्षात देशाच्या विकासदरात 2 टक्के वाढ साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केले. पुणे श्रमिक पत्रकार संघाचे संस्थापक ज. स. करंदीकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. देशापुढची आव्हाने कठीण आहेत.
मोदी सरकारकडून जनतेच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या आहेत. गतिमान व पारदर्शक कारभार आणि जलद निर्णयक्षमतेच्या आधारावर त्या पूर्ण करण्याचा विश्वास आहे, असे ते म्हणाले. संघाचे अध्यक्ष महेंद्र बडदे, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश घोंगडे या वेळी उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, की विकास कामांपेक्षा जातिवादी, सांप्रदायिक मतपेढीच्या राजकारणावर काही पक्षांचा जास्त डोळा आहे. मागासलेले-पुढारलेले, हिंदू-मुस्लिम अशी फुट पाडून जातींचे राजकारण यशस्वी करण्याचा डाव मतदारांनी लोकसभा निवडणुकीत हाणून पाडला.
शिर्र्डीला विमानसेवा : मुंबईच्या समुद्रातून शिर्डीला विमानसेवा सुरू केली जाणार आहे. जमीन व पाणी अशा दोन्ही ठिकाणी उतरू शकणारे विमान यासाठी वापरले जाणार आहे. शिर्डी जवळच्या तलावात हे विमान उतरेल,असे गडकरी यांनी सांगितले.
मोदी सरकारची पंचसूत्री : महागाई आटोक्यात आणणे, देशाचा विकासदर 8 टक्क्यांवर पोहोचवणे, पेट्रोल-क्रूड तेलाची आयात कमी करणे, कृषी विकास दरात वाढ आणि देशाची सुरक्षा या पंचसूत्रीवर मोदी सरकार काम करत आहे. येत्या दोन वर्षात ‘अच्छे दिन’ देशाला दिसू लागतील, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.