अकोला - वादग्रस्त राहिलेले पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिश्र यांना शांततेचा महात्मा गांधी राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. याबाबतची घोषणा त्यांनी केली. मिश्रंच्या काळात गुन्हेगारीचा आलेख वाढतच राहिला. असे असताना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल जाणकारांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
जिल्ह्यातून जाता जाता वीरेंद्र मिश्र यांनी सोमवारी सायंकाळी पोलिस मुख्यालयात पोलिस अधिका-यांना मार्गदर्शन केले. सहका-यांशी बोलताना पुरस्काराची गोड बातमी त्यांनी या वेळी सांगितली. ऐकणारेही अवाक् झाले. एकही उल्लेखनीय कामगिरी नावावर नसलेल्या मिश्रंच्या बदलीच्या आनंददायी बातमीबद्दल अकोलेकर सुटकेचा श्वास सोडत नाही, तोच मिश्र यांना पुरस्कार मिळाल्याची बातमी येऊन धडकली आहे. हा पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिश्र यांना मिळणार आहे. गेल्या वर्षी सरपंच सिद्धेश्वर देशमुख यांची दिवसा गोळ्या घालून झालेली हत्या. त्यानंतर माजी आमदार तुकाराम बिरकड यांचा पीए ज्ञानेश्वर वानखेडे यांची हत्या, नगरसेवक अजय रामटेके यांच्यावर दोन वेळा झालेला गोळीबार, चार दिवसांपूर्वी बसस्थानकासमोर दुपारी 10 ते 12 गुंडांनी धुडगूस घालून केलेली तोडफोड. या घटनांचे मूळ मिश्र यांच्या नेतृत्वात पोलिसांना शोधून काढता आले नाही.