अमरावती- अमरावती जिल्हात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक मंगळवारी (१६ डिसेंबर) जिल्ह्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.
अमरावती जिल्हासह संपूर्ण राज्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. याचे अवलोकन करण्यासाठी प्रवेश शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्यीय पथक १४ डिसेंबरपासून राज्यात दाखल झाले आहेत.
राज्यातील २०१४ च्या खरीप हंगामामध्ये झालेल्या कमी पर्जन्यमान्यामुळे उद्भवलेल्या दुष्काळसदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासनाने केंद्राकडे आर्थिक मदत मागणी केली आहे. त्या अनुषंगाने हे केंद्रीय पाहणी पथक मंगळवारी अमरावती जिल्ह्यातील पीक परिस्थिती, शेतकऱ्यांशी संवाद, पिण्याचे पाणी, जनावरांना चारा, भूजल पातळी, सिंचन व्यवस्था तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांंच्या भेटी घेणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.