अमरावती- कचरामुक्त अमरावतीसाठी ठोस पाऊल उचलताना शहरातील विद्यार्थी, प्राध्यापक, शासकीय कर्मचाऱ्यांनी रविवारी ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली. स्वत:चे घर स्वच्छ ठेवताना मनात निर्माण होणारी
आपलेपणाची भावना शहर स्वच्छतेच्या बाबतीतही सामान्यांमध्ये रुजावी, यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. यापुढे प्रत्येक रविवारी स्वच्छता मोहीम राबवण्याचा संकल्पही उपक्रमात सहभागी नागरिकांनी या वेळी केला.
आपलं शहर सुंदर, स्वच्छ निरोगी राहावं, यासाठी आपणच पुढाकार घ्यायला हवा. लोकांना स्वच्छतेची सवय पडावी, जेणेकरून शहरात कचऱ्याची समस्याच निर्माण होणार नाही. यासाठी समविचारी तरुणांनी एकत्र ऐऊन स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. अधिकाधिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या मोहिमेत सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. रविवारी सकाळी प्रभात चौकापासून स्वच्छता मोहिमेस सुरुवात झाली. परिसरातील प्रतिष्ठानांमधून निर्माण होणारा कचरा नागरिकांनी या वेळी गोळा केला महापालिकेच्या वाहनात टाकला. त्यानंतर शिवाजी मार्केट, श्याम टॉकिजच्या मागील सर्व्हिस लाइन स्वच्छ करण्यात आली. राजकमल चौक, जयस्तंभ चौक हा परिसरही नागरिकांनी झाडून साफ केला. सुमारे ३० जण या मोहिमेत सहभागी झाले होते. आनंद आमले, संदीप पवार, उमेश वाघ, दिनेश वाटकर, संदीप अढाऊ, भुजंगराव डबाळे, सादिक पटेल, समाजकार्य महाविद्यालयातील कर्मचारी पंकज गावंडे, महेश गभणे, विजय बागडे, हर्षल इंगोले, विद्यार्थी सूरज गवई, रोहित भालेकर, मयूर इंगळे, स्वाती माकोडे, हेमंत खेरडे आदींचा या अभियानात सहभाग आहे.
प्रभात चौकापासून स्वच्छता मोहिमेची सुरुवात झाल्यानंतर नागरिकांनी अनेक गल्ल्या, सर्व्हिस लाइन स्वच्छ केल्या.