छायाचित्र : उपराजधानीतील पूर्ती उद्योग समूहाच्या ‘सूपर बाजार’च्या उद्घाटन कार्यक्रमानिमित्त केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी नागपुरात एकत्र आले होते. सुपर बाजारमधील भाजीपाल्याची पाहणी करताना गडकरींनी पासवानांना नागपुरी ‘गाजरा’ची महती पटवून दिली.
नागपूर - काही साधुसंत आणि भाजपचे खासदार व साध्वी सध्या किती मुले असावीत यावरून वादग्रस्त वक्तव्ये करत आहेत. हा केंद्रातील
नरेंद्र मोदी यांच्या सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. परंतु, त्यांची वक्तव्ये म्हणजे सरकारची भूमिका नाही,असे स्पष्टीकरण लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष व केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी रविवारी दिले. भारतीय खाद्य निगमच्या कामकाजाचा आढावा बैठकीसाठी ते नागपुरात आले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पासवान म्हणाले,
पंतप्रधान नरेंद्र मोदींची जादू ओसरत चालली आहे, हा विरोधकांचा भ्रामक प्रचार आहे. मोदींची जादू आणि झंझावात आजही देशभर कायम आहे. जम्मू-काश्मीर आणि झारखंडच्या नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत याचा अनुभव आला. आता दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीतही मोदींचा झंझावात सर्वांना दिसून येईल. या वर्षी होणा-या बिहार विधानसभेच्या निवडणुका मोदींच्या नेतृत्वाखालीलच रालोआमार्फत लढवण्यात येईल. मोदी हेच केंद्रातील सरकारचा आणि निवडणुकीचा चेहरा आहेत, हे सांगण्यासही पासवान विसरले नाहीत.
आपल्या एकत्र येण्याने काँग्रेस आणि भाजपच्या उरात धडकी बसेल या भ्रमात बिहारमधील काही नेते वावरत आहेत. पण, तसे होताना दिसत नसल्याने काही दिवसांनी त्यांच्यातच यादवी होईल. लालूप्रसाद यादव कंदील, तर मुलायमसिंह यांना सायकल सोडवत नाही. नितीशकुमारांना घाई सुटलीय, तर लालूप्रसादांना अजिबात घाई नाही. मुळात या एकत्र येण्याला काहीच अर्थच नाही, असेही पासवान म्हणाले.
जनता परिवार हे लठबंधन
जनता परिवाराच्या नावाखाली एकत्र आलेले मुलायमसिंह, लालूप्रसाद, देवेगौडा, नितीशकुमार आणि अभयसिंह यादव या पाच जणांमध्ये लवकरच लाथाळ्या सुरू होतील. आणि नंतर ते परत वेगळे होतील. "जनता परिवार हे गठबंधन नव्हे, तर लठबंधन आहे'', अशी टीका रामविलास पासवान यांनी या वेळी केली.