आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापातूर- तालुक्यातील चान्नी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पांढुर्णा येथील प्रवेशद्वारावर झेंडे लावण्यावरून गावातील दोन गट आमने-सामने आल्याने गावात रविवार, १४ जानेवारी रोजीच्या रात्री तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. चान्नी पोलिस घटनास्थळी वेळीच पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला. सोमवार, १५ जानेवारी रोजीही गावात शांततापूर्ण तणावाचे वातावरण होते. चान्नी पोलिसांनी शांतता समितीची बैठक घेऊन हा वाद मिटवला आहे.
ग्रामपंचायतचे ना हरकत प्रमाणपत्र घेऊनच झेंडे लावण्याचे बैठकीत ठरले. रविवारी रात्री गावाच्या प्रवेशद्वारावर झेंडे लावले. मात्र, दुसऱ्या गटातील युवकाने त्यावर आक्षेप घेतला. त्याला विरोध झाल्याने गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. रविवारी रात्री दोन्ही गटाचे नागरिक लाठ्या-काठ्या घेऊन समोरासमोर आले. घटनेची माहिती मिळताच चान्नीचे ठाणेदार गजानन खार्डे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी गावात धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
या प्रकरणी पातूरचे तहसीलदार रामेश्वर पुरी, बाळापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोहेल शेख, पातूरचे ठाणेदार डी. सी. खंडेराव, सामाजिक कार्यकर्ते यांनी गावाला भेट दिली. वाद आपसात मिटवला. वृत्त लिहेपर्यंत याबाबत चान्नी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.