आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्णीत मुसळधार पावसाचा कहर...घरांमध्ये घुसले पाणी..पूराचा धेाका कायम, प्रशासन सज्ज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आर्णी- संततधार सुरू असलेल्‍या पावसाने झोडपून काढल्‍याने गुरूवारी आर्णी शहरात अरूणावती नदीचे पाणी शहरात घुसले आहे. अनेकांच्‍या घरात पाणी गेल्‍याने मोठे नुकसान झाले तर दुसरीकडे शहरातील व्‍यापारी वर्गाचे सुद्धा लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. रात्री उशीरापर्यंत प्रशासनाच्‍या वतीने बचाव कार्य सुरू होते.

 

अरूणावती नदीच्‍या काठी असलेल्‍या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्‍यात आले असतांना नागपूर-तुळजापूर राष्‍ट्रीय महामार्गावर अडकलेल्‍या प्रवाशांना तहसील कार्यालयात आणून त्‍यांची जेवण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यात आली. तालुक्‍यातील कवठा बाजार, साकूर, राणीधोरा, जवळा, सावळी, अजंनखेड आदी गावांचा गुरूवारी रात्री संपर्क तुटला होता.

 

संभाव्य पूर परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी तहसील, नगर परिषद आणि पोलिस प्रशासन सज्ज असल्याची माहिती देण्यात आली आहे. शहरातील नदी काठी असणाऱ्यांना नागरिकांनी रात्रभर सतर्क राहण्याचे आवाहन नगर परिषद प्रशासनाकडून करण्‍यात आले आहे.

 

संभाव्य पूराचा धोका लक्षात घेत नगर परिषदेचे मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण, परिविधीन उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार संदीप भस्के, नगराध्यक्ष अर्चना मंगाम यांनी नदी काठच्या परिसरात जावून पाहणी केली. नागरिकांना सतर्क राहण्‍याचे आवाहन केले.

 

अचानक पंधरा- वीस दिवसांची दडी मारलेल्या पावसामुळे शेतकरीवर्ग चिंतेत होता. मात्र, सलग दोन दिवसांपासून सतंतधार पावसाने शेतकरीराजा सुखावला आहे. संतत पावसामुळे अरूणावती नदी व नाल्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा परिस्थितीत पाणी, हवेमुळे विद्युत खांब व विद्युत वाहिण्या  नदी पात्रात पडून नदी काठच्या परिसरातील नागरिकांची जीवितहानी होऊ नये, यासाठी 24 तास पालिकेतील कर्मचारी नागरिकांच्या सुरक्षेसाठी सतर्क राहण्याचे आदेश मुख्याधिकारी यांनी दिले आहे. सकाळी उदय नगरातील नागरिकांना शंकर मारबते यांच्‍या कडून घरपोच खिचडी वाटप करण्‍यात आली. बाबा कंबलपोष दर्गा ट्रस्टकडून नागरिकांना अन्‍नदान करण्‍याचे काम शहरात सुरू आहे.

 

पूरस्थिती मुकाबला करण्‍यासाठी प्रशासन सज्ज

आर्णी शहरासह 45 गावातील नदी आणि नाल्यात काठी राहणाऱ्या नागरिकांना तहसील प्रशासनाकडून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले. स्थानिक स्वस्त धान्य दुकानदारांना नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था करण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. सर्व मंडळधिकारी यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

- संदीप भस्के, परिविधीन उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार आर्णी

 

'संभाव्य पूरस्थिती निर्माण होण्‍याची दाट शक्‍यता असल्याने पालिका प्रशासन सज्ज आहे. नदी काठच्या नागरिकांना सतर्क राहण्याची सुचना देण्यात आल्या  आहेत. त्याचबरोबर नागरिकांच्या मदतीसाठी सुरक्षारक्षकांना योग्य ती साहित्य देऊन नदी काठी तैनात करण्यात आले आहे.'

 - करणकुमार चव्हाण, मुख्याधिकारी न.प.आर्णी

 

बातम्या आणखी आहेत...