अकोला - मी शेतकऱ्यांचे, शेतमजूरांचे, मश्छिमारांचे प्रश्न मांडतोय याला कुणी बंड म्हणत असेल तर ते मला मान्य आहे. केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर मी टीका सुरु केली त्यांच्या दुसऱ्याच दिवशी माझा 'छगन भुजबळ' केला असता याची मला जाणीव आहे. मात्र माझे घरच काचेचे नसल्याने मला कुठलीही भीती नाही, असे रोखठोक मत भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी रविवारी 'दिव्य मराठी'शी बोलताना व्यक्त केले.
खासदार नाना पटोले म्हणाले की, मी मोदी लाटेत निवडून आलेला माणूस नाही. मी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा वातावरणात निवडून आलो आहे. निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण होत नाही. मी जनतेचे प्रश्न जाणतो आणि ते मांडण्यांचा, त्यावर चर्चा घडवून आणण्याचा मला अधिकारच नसेल तर अशा सत्तेला अर्थ काय?. मला पक्षातून काढून टाकले तर मी खासदारकीही सोडून देईन. सत्ताधारी पक्षाचा खासदार असताना संसदेत मत मांडण्याचा अधिकार नसेल, तर मी खुर्चीला चिकटून राहणारा नेता नाही. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मी फिरतोय, शेतकऱ्यांची लूट आणि त्यांच्यावर कसा अन्याय होत आहे हे मी पाहतोय. या विषयी मी बोलणारच आणि बोलत राहीन. त्यासाठीच शेतकऱ्यांचे सरकार आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि ते आगामी काळात येणारच, असे सांगत खासदार नाना पटोले यांनी त्यांची पुढील वाटचाल शिवसेनेच्या दिशेने असल्याचे संकेत दिले.
पवारांचे राजकारण सेटलमेंटचे तर शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावे-
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना शेतीचा चांगला अभ्यास आहे. असे असतानाही ते सध्या सेटलमेंटचे राजकारण करीत आहे. त्यांचे राजकारण न समजण्याइतपत जनता दुधखुळी नाही. तर शिवसेना महागाईवर आंदोलन करीत आहे. पण तत्पूर्वी त्यांनी सरकारमधून बाहेर पडल्यास विरोध आणखी प्रखरपणे करता येईल, असे खासदार नाना पटोले म्हणाले.
फडणवीस सारखा माणूस नेता यापेक्षा लाजीरवाणी बाब कोणती?-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे व्हिजन काय आहे, हे मला माहित आहेत. फडणवीस सारखा माणूस या राज्याचा नेता आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात यापेक्षा लाजीरवाणी बाब ती काय असू शकते. छत्रपतींचा राज्यभिषेकही केला नाही, अन् तुम्ही त्यांचेच नाव घेता आणि सत्तेतही तुम्हीच, असे बोलून खासदार नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यावर तोफ डागली.