वाशीम - मॉर्निंग वॉकला गेलेल्या तीन शाळकरी मुलांना भरधाव कारने चिरडले. ही दुर्दैवी घटना जिल्ह्यातील सवड (ता. रिसोड) येथे आज (सोमवार) सकाळी 6 वाजताच्या सुमारास घडली. वैभव वाळके (12), अंकित जाधव (12) आणि करण खानझोडे (13) अशी मृतांची नावे आहेत.
नेमके काय झाले ?
रिसोड - वाशीम मार्गावर सकाळी - सकाळी वाहनांची फारशी वर्दळ नसते. त्यामुळे रिसोड, सवड, चिखली, वनोजा येथील अनेक नागरिक रोज सकाळी या रस्त्यावर फिरायला जातात. सोमवारी सकाळी वैभव, अंकित आणि करण हे तिघे मित्रंही फिरायला गेले. मात्र, वाशीमवरून रिसोडकडे जाणाऱ्या एका भरधाव कारने त्यांना धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, कार चालक घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणी रिसोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
फिरायला जाण्याचा होता पहिलाच दिवस
या तिघांचाही फिरायला जाण्याचा हा पहिलाच दिवस होता. उत्तम आरोग्यासाठी मोठ्या उत्साहाने त्यांनी रात्री एकत्र येत रोज सकाळी फिरायला जाण्याचा बेत आखला होता. पण, नियतीच्या भांड्यात वेगळेच रसायन शिजत होते. त्यांचा पहिला दिवस आयुष्याचा शेवटचा दिवस ठरला.
आभाळाएवढे दु:ख तरीही आई वडिलांनी घेतला नेत्रदानाचा निर्णय
आपल्या काळजाच्या तुकड्याचा अकाली मृत्यू झाल्याचे दु:ख बाजूला सारत या तीनही मुलांच्या आई वडिलांनी प्रखर सामाजिक जाणिवेतून त्यांचे मरणोतर नेत्रदान घडवून आणले. त्यामुळे सहा अंधांच्या जीवनात प्रकाशाची पेरण होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...