अमरावती - दोन वर्षांपूर्वी राज्यात उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्याकरिता राज्य सरकारने घोषित केलेल्या तेराशे कोटींच्या दुष्काळ निधी वाटपास राज्य सरकारने सोमवारी तडकाफडकी मंजुरी दिली. कोणत्याही क्षणी जिल्हा परिषद आणि महापालिकेची लागणारी आचारसंहिता लक्षात घेता दोन वर्षांपासून रखडलेला हा दुष्काळनिधी शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
या संदर्भात मदतनिधी वितरित करण्याकरिता राज्य शासनाच्या महसूल आणि पुनर्वसन विभागाने राज्य सरकारचा शासन निर्णय सोमवारी एका अधिसूचनेद्वारे प्रसृत केली आहे. यानुसार राज्यातील औरंगाबाद, नाशिक, अमरावती, आणि नागपूर विभागातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ही मदत देण्यात येणार आहे.२०१५ मध्ये अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यात सोयाबीन, कापूस, धान या महत्वाच्या पिकांचा समावेश होता. याकरिता राज्य सरकारने केंद्राकडे मदतीचा प्रस्तावही पाठविला होता. सहा महिन्यांपूर्वी या प्रस्तावाच्या अनुषंगाने केंद्रीय पथकाने मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन पाहणी दौरा केला होता. राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेली ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत जमा करण्यात येणार आहे. विशेष मोहिम घेऊन ही मदत तातडीने सर्व शेतकऱ्यांना वितरित करावी, अशा सूचना अधिसूचनेद्वारे राज्य सरकारने दिल्या आहेत.
अमरावती विभाग
अमरावती-१०९.३६,अकोला-६०.३८, बुलडाणा-१६१.४२, यवतमाळ-७४.०१, वाशिम-३८.३८, एकूण-४४३.५५ (रक्कम कोटीत)