(फाइल फोटो...)
अमरावती- अर्जुन नगरपरिसरातील टेलिकॉम काॅलनीची खुली जागा वाचनालयासाठी िदली जावी, अशी त्या भागातील सावित्रीबाई फुले महिला मंडळाची मागणी होती.या मागणीला अनुसरून मनपा आमसभेने मंगळवारी वेळेवरचा प्रस्ताव पारित केला. मनपाच्या या सर्वसमावेशक निर्णयामुळे अतिक्रमणाच्या नावाखाली सोमवारी ध्वज हटवल्यामुळे िनर्माण झालेला ताणतणाव दूर झाला आहे.
हा निर्णय ऐकण्यासाठी सदर महिला मंडळाच्या सर्व पदाधिकारी-कार्यकर्त्या बसपा आणि रिपाइंसह इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रेक्षक गॅलरीमध्ये गर्दी केली होती. काही विपरीत होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्तही लावण्यात आला होता. तत्पूर्वी प्रा. डॉ. प्रदीप दंदे यांनी या मुद्द्याची विस्तृत अत्यंत निरपेक्ष अशी मांडणी केली. त्यांचा शब्द-न-शब्द सभागृहात अत्यंत बारकाईने ऐकला जात होता.
ते म्हणाले, २००७ मध्येच महिला मंडळाने पत्र दिले आहे. त्याही पूर्वीपासून (२००३ पासून) तेथे पंचशील ध्वज आहे. मात्र, कालच्या कारवाईदरम्यान प्रशासनाने तो हटवला. दरम्यानच्या काळात २००९ मध्ये न्यायालयाने एक आदेश दिला. त्या आधारे २०११ साली शासनाने एक निर्णय घेतला. या निर्णयात जी धार्मिक स्थळे अवैध आहेत, एकतर ती नियमानुकूल करा नाहीतर सर्वची सर्व पाडून टाका, असे म्हटले होते.दरम्यानच्या काळात दिगंबर डहाके, प्रवीण हरमकर, प्रशांत वानखडे प्रदीप बाजड यांनीही या विषयात मांडणी केल्यानंतर हा प्रस्ताव मंजूर केला गेला.