शेगाव: शिवसेना नेहमीच शेतकऱ्यांसाठी लढत आली असून, यापुढेही लढणार आहे, मात्र शेतकऱ्यांना हमीभाव नाही म्हणणाऱ्या सरकारची काही हमी नाही, असे प्रतिपादन करत शेतकऱ्यांबाबत अपशब्द उच्चारणाऱ्यांना शेतकरी रडवणार अाहे. कारण निवडणुकीच्या अगोदर काय बोलायचे आणि निवडून आल्यानंतर दुसरेच बोलायचे असा प्रकार शिवसेनेत नाही, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
शेगाव येथील कृष्णा कॉटेज येथे आज १५ जून रोजी शेतकरी शिवसेनेच्या पश्चिम विदर्भातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा अायोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी ठाकरे म्हणाले की, कर्जमुक्तीला फाटा म्हणजे मध्यावधीचे वक्तव्य, मध्यावधीसाठी पैसा आहे आणि शेतकऱ्यांना द्यायला नाही. मध्यावधीसाठी लागणारा सर्व पैसा शेतकऱ्यांना देऊन सातबारा कोरा करा, असे मत त्यांनी मांडले. दीपप्रज्वलन शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या वेळी मंचावर ना.रामदास कदम, ना.दिवाकर रावते, ना.दीपक सावंत, ना.गुलाबराव पाटील, आ.निलमताई गोऱ्हे, खा. विनायक राऊत, खा सावंत, खा.चंद्रकांत खैरे, खा. भावनाताई गवळी तसेच बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव,सेनेचे आमदार, जिल्हा प्रमुख, उपजिल्हाप्रमुख, माजी आ. विजयराज शिंदे आदींची उपस्थिती होती. यावेळी शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती तर सेना कार्याध्यक्षांनी यावेळी चौफेर फटकेबाजी केली.
शेतकऱ्यांसाठी लढू
राज्यामध्ये शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा यासाठी जनआंदोलन पेटले होते त्यानंतर शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली. या सर्व काळात शिवसेना शेतकऱ्यांच्या बाजूने होती. यापुढेही शिवसेना शेतकऱ्यांसाठी लढणार असून त्यांना त्यांचा हक्क देऊ. भविष्यात गरज पडली तर यासाठी आंदोलन उभारण्याचा विचारही यावेळी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला आहे. यावेळी इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन केले.