आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला: आधी विद्यार्थ्यांवर दबाव; मग व्यवस्थापन आले ताळ्यावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोरगावमंजू (जि. अकोला) - शिक्षण श्रेत्राला काळिमा फासणारे कृत्य बुधवारी अकोला जिल्ह्यातील बोरगावमंजू येथील श्रीमती लीलाबाई केशवराव नाईक विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात घडले. एक नव्हे तर तब्बल ५० पेक्षा जास्त अकरावी-बारावीच्या शेतकऱ्यांच्या मुलांना फी न भरल्याने परीक्षागृहातून हाकलण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दैनिक ‘दिव्य मराठी’मध्ये वृत्त प्रकाशित झाल्यावर आपल्या कृतीची जराही शरम न बाळगता विद्यार्थ्यांना धमकावत त्यांच्यावर दबाव टाकून असा प्रकार घडलाच नसल्याचे लिहून घेण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू देण्यात आले.
महाविद्यालयाची प्रवेश फी न दिल्याने परीक्षेपासून वंचित ठेवणाऱ्या शेतकऱ्यांच्या ५० पेक्षा जास्त अकरावी-बारावीच्या मुलांना गुरुवारी २१ जानेवारी रोजी संस्थेने नमते घेत परीक्षेस बसू दिले; पण त्यापूर्वी विद्यार्थ्यांना धमकावत असा कुठलाच प्रकार घडला नसल्याचे लिहून घेतले. या प्रकरणाची चाैकशी करण्यासाठी गुरुवारी गेलेले सहायक शिक्षण उपनिरीक्षक ए. ए. राठोडही कागदं काळे करून परतले. "दिव्य मराठी'मध्ये "फी न भरल्याने शेतकऱ्यांच्या ५० मुलांना परीक्षागृहातून हाकलले' या मथळ्याखाली गुरुवारी वृत्त प्रकाशित होताच शिक्षण विभागात खळबळ उडाली. गुरुवारी माध्यमिकचे शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले. त्यावरून सहायक शिक्षण उपनिरीक्षक ए. ए. राठोड यांनी शाळेला भेट देऊन घडलेल्या प्रकाराची चौकशी केली. चौकशी करून सर्व बाबींचा अहवाल तयार करून शिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आला आहे.

बोरगावमंजू येथील शासनमान्य कायम विनाअनुदानित लीलाबाई केशवराव नाईक विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात फी न भरलेल्या मुलांना पेपरपासून वंचित ठेवले होते. प्राचार्य प्रीती नालट यांनी ५० पेक्षा जास्त विद्यार्थी, विद्यार्थिनींना परीक्षेला बसू न देता त्यांना वर्गाबाहेर काढले होते. दरम्यान, आम्ही शेतकऱ्यांची मुले आहोत या वर्षी पीक न झाल्यामुळे आमच्याकडे पैसे नाहीत, असे विद्यार्थ्यांनी सांगितल्यावरही त्यांचे ऐकून घेण्यात आले नाही. व्यवस्थापन समिती अध्यक्ष नाजुकराव गमे यांनीही विद्यार्थ्यांचे ऐकले नाही. शेवटी विद्यार्थ्यांना परीक्षा न देताच परतावे लागले होते. या प्रकाराबाबत पालकांनी संताप व्यक्त केला असून, ते जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची भेट घेणार आहेत.
संस्थेवर कारवाई करावी
^आम्ही अल्पभूधारक शेतकरी आहोत. पीक नाही, मजुरी नाही. दुष्काळात खायचे वांधे झाले आहेत. ऐन परीक्षेच्या दिवशी मुलांचा अपमान करून त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या संस्थेवर कारवाई करण्यात यावी.
अनिल इंगळे, शेतकरी.
नि:पक्षपणे केली चौकशी
शिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले. प्राचार्यांसह संपूर्ण शाळेचे कर्मचारी व संबंधित विद्यार्थ्यांची चौकशी केली. त्याचा अहवाल तयार केला. हा अहवाल शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांच्याकडे देण्यात येत आहे.
आत्माराम राठोड, सहायक शिक्षण
विद्यार्थ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न
चौकशीदरम्यान, शाळा व्यवस्थापनाकडून विद्यार्थ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. काही विद्यार्थ्यांकडून शाळेत असा प्रकार घडला नसल्याचे लिहून घेण्यात आले. मात्र, सहायक शिक्षण उपनिरीक्षकांनी व्यवस्थापन व प्राचार्यांना धारेवर धरले. विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून त्यांना बोलते केले. या वेळी अनेक विद्यार्थ्यांनी घडलेल्या प्रकाराबाबत सांगितले. विद्यार्थ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, तर तुमच्यावर त्वरित कारवाई करण्यात येईल, असा इशाराही सहायक शिक्षण उपनिरीक्षक यांनी दिला.