नागपूर - भाजपने आपल्या जाहीरनाम्यात आश्वासन दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वामिनाथन अहवालातील शिफारशींची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने रविवारी नागपुरात केली.
विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय महासचिव डॉ. सुरेंद्र जैन यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले, देशभरात शेतकऱ्यांची परिस्थिती चांगली नाही. भाजपने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात दिले होते. त्यामुळे आता भाजपने त्यावर टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी केली पाहिजे. केंद्र सरकारने देशभरासाठी गोवंश हत्याबंदीचा कायदादेखील लागू करावा, अशी मागणी करून जैन म्हणाले, अलीकडेच केरळमध्ये युवक काँग्रेसच्या वतीने बीफ पार्टीचे आयोजन पुन्हा करण्यात आले. ज्या महात्मा गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष लढला त्या पक्षाकडूनच गांधी विचारांना हरताळ फासला जात आहे. काँग्रेसचे हे पतन आश्चर्यजनक आणि निराशाजनक आहे. काँग्रेसचे लोक महात्मा गांधींचे स्वप्न पूर्ण करीत आहेत की राहुल गांधींचे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.