अमरावती - बोगसपट संख्या रोखण्यासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये ‘सेल्फी मॅनिया’ वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. अध्यापन सोडून शिक्षकांना तंत्रस्नेही बनविण्याच्या नावाखाली नवनवीन प्रयोग करणाऱ्या निर्णयाचा संघटनांची देखील कडाडून विरोध केला आहे. ‘सेल्फी’मुळे शैक्षणिक क्षेत्रात नवीन वादळ येण्याची चाहूल लागत आहे.
‘गुरुर्र ब्रह्मा, गुरुर्र विष्णू, गुरूर्र देवो महेश्वरा, गुरुर्र साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवै नम:’ असा उच्चमत दर्जा शिक्षकांना भारतीय संस्कृतीने दिला आहे. आई-वडिलानंतर शिक्षक हे मुला-मुलींचे गुरुजन असतात. शिक्षण घेत असताना पालकांपेक्षा मुले-मुली सर्वाधिक वेळ गुरुजींच्या सानिध्यात असतात. त्यामुळे सहाजिकच शिक्षकांचे अनुकरन मुलांकडून केल्या जाते.
शाळेतून घरी आल्यानंतर मुले-मुली शिक्षकांची नक्कल करीत अनुकरण करुन दाखविण्याचे प्रकार पालकांना नवीन नाही. मात्र, शासनाकडून घेण्यात येणारे निर्णय शिक्षकांसोबत पालकांसाठी देखील डोकेदुखी ठरण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. अध्यापन कार्यापेक्षा स्मार्ट फोनचा वापर करीत उपस्थिती दर्शविण्याकरीता विद्यार्थ्यांसोबत ‘सेल्फी’ घेण्याचे नवीन कार्य शासनाने शिक्षकांच्या मागे लावले आहे. शाळेत शिक्षक मोबाइल फोनचा वापर करीत सेल्फी काढत असेल तर विद्यार्थ्यांकडून त्याचे अनुकरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्मार्ट फोनचा वापर करणारी अनेक युवक-युवती ‘स्मार्ट फोन मॅनिया’ने त्रस्त असल्याचे वास्तव सर्वेक्षणातून पुढे आले आहे.
शिवाय आपल्या सभोवताली, गल्ली-बोळात मुले-मुली मोबाइलमध्ये डोके खुपसून राहत असल्याचे चित्र आढळून येते. सद्यस्थितीत तरुण पिढीचे चित्र लक्षात घेता ‘सेल्फी’ निर्णयाचा विद्यार्थ्यांच्या बालमनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता पालकांकडून वर्तविली जात आहे. शाळेच्या हजेरी पटावरील बाेगसगिरी रोखण्यासाठी असलेली विद्यार्थ्यांची ‘सेेल्फी’ पेक्षा अन्य पर्यायांचा शासनाने विचार करणे गरजेचे असल्याचे मत शैक्षणिक क्षेत्रातून उमटत आहे. पटावरील बोगस विद्यार्थ्यांची संख्या रोखण्यासाठी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी ‘सेल्फी वुईथ स्टुंडन्ट’ या योजनेची घोषणा नोव्हेंबर २०१६ मध्ये केली. सोमवार जानेवारीपासून ही योजना आरंभ होणे अपेक्षीत होते, मात्र सुरुवात होण्यापूर्वीच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. वर्ग ते १२ वी पर्यंतच्या सर्व मुलांचे आधार कार्ड या सरल प्रणालीला आधी जोडावे लागणार आहेत. याची जोडणी झाल्यानंतर संबंधिताचे फोटो काढल्यानंतर ते या लिकंशी जोडले जाणार आहेत. आधार क्रमांक नसेल तर ही जोडणी करणे शक्य होणार नाही. वर्ग ते १२ वीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्याचे आधार क्रमांक असतील असे नाही तसेच या मधल्या काळात हे क्रमांक जोडण्याचा वेग पाहता अजून काम पूर्ण झालेले नाही.
शिक्षक संघटनांचा विरोध : शासनासहसर्व माध्यमांच्या शाळांमधील वर्ग ते १२ मधील मुला-मुलींचे फोटो काढत ते अंड्राइड मोबाइल अॅप्लीकेशनच्या माध्यमातून अपलोड करावे लागणार आहे. ग्रामीण भागात इंटरनेटचे नेटवर्क तसेच गती मिळत नसल्याने ‘सेल्फी’अपलोड करावी तरी कशी असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. त्यामुळे शिक्षक संघटनांनी विरोधाचा सूर आवळला आहे.
तंत्राच्या नादात ते अडकू नये : शिक्षणपद्धतीच्या प्रत्येक टप्प्यावर तंत्र’ या माध्यमाचा वापर आढळतो. मग ते शिकवण’ असो वा व्यवस्थापन’. काळ सुसंगत शिक्षण शास्त्रात बदल व्हावेत आणि ते अपेक्षित आणि आवश्यक पण आहेत. मात्र काळ सुसंगत होताना गती’च भान असावे. अध्ययन पेक्षा हजेरी महत्वाची हा सरकारी अवगुण या वयात मनात कोरला जाऊ नये.
हा प्रयोग वेगवेगळ्या स्तरावर झाला ठराविक सातत्य राखल तर आणि तरच उत्तम अन्यथा लअर्निग प्रोसेस मध्ये दोन भाग असतात पॉझेटिव्ह लअर्निंग आणि निगेटिव्ह लअर्निंग. हा सगळा हवशा नवशा चा प्रयोग निगेटिव्ह लर्निंगकडे वळायचा पुन्हा हे सावरण्या करीता परत तंत्राचा आधार घ्यावा लागेल असे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट पंकज वसाडकर यांनी सांगितले.
विद्यार्थिनींसोबत सेल्फी कशी घेणार
वर्ग एक ते चार ठिक आहे, मात्र बाराव्या वर्गामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीसोबत शिक्षकाने सेल्फी घेणे कितपत योग्य अाहे. या निर्णयाचा समाजात उलट परिणाम होण्याची शक्यता आहे. शिवाय सेल्फी काढण्यातदिवस वाया जाणार असल्याने अध्यापनाचे कार्य कमी होईल. एन.एस.आकोलकर, पालक.
मुलांवर दुष्परिणाम
मुलांना शिक्षणप्रक्रियेत आणण्यासाठी सेल्फी हा एकच मार्ग नाही. सेल्फीनंतर शाळाबाह्य मुलांमध्ये फार परिवर्तन होईल, असेही नाही. त्यासाठी अध्यापनाची गोडी निर्माण करणे गरजेचे आहे. मोबाइल कॅमेरांकडून फोटो घेताना निघणाऱ्या किरणांचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांवर होण्याची शक्यता आहे. सुचिताबर्वे, सामाजिक कार्यकर्ता.
अशी हवी सेल्फी
- विद्यार्थीग्रुपवाईज
- शाळाबाह्य विद्यार्थी
- सतत अनियमित विद्यार्थी
विद्यार्थ्यांसोबतसेल्फी घेत मोबाइल अॅपवर अपलोड करण्याच्या निर्णयाविरोधात शिक्षकांनी मनीबाई गुजराथी हायस्कूलसमोर मंगळवारी (दि.१०) घोषणाबाजी केली. यावेळी शिक्षण संघर्ष समितीने शिक्षणाधिकारी (माध्य.) सी. आर. राठोड यांना निवेदन दिले.
राज्यातील प्रत्येक शाळेचा विचार केल्यास आदिवासी, दुर्गम भागात तसेच अपुरे तंत्रज्ञान आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या वेळी तांत्रिक अडचणी येतात. यासह शाळेतील मुलींच्या पालकांनी देखील या निर्णयाचा विरोध केला आहे. दैनंदिन अध्यापन, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम या निर्णयावर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे. सेल्फी उपक्रमात शिक्षकांनी सहभागी होऊ नये, तसेच सेल्फी काढण्याचा फेरविचार करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी समितीच्या अध्यक्षा संगिता शिंदे, शरद तिरमारे, ललीत चौधरी, विकास दिवे, प्रदीप नानोटे, संजय कातोडे, बाळासाहेब वानखडे, मनोज कडू, मोहम्मद एजाज, रवींद्र हगवणे, डॉ. बबन राऊत, सचिन अंजीकर आदी उपस्थित होते.