चंद्रपूर- अस्वालाच्या हल्ल्यात 3 ठार व 5 जखमी झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील आलेवाहीच्या जंगलात घडली आहे. जखमींपैकी 2 जणांची प्रकृती गंभीर असून उपचारासाठी त्यांना चंद्रपूरला हलवण्यात आले आहे. तर दुसऱ्या एका घटनेत शेतात काम करत असतानाच शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केला. गडचिरोलीमधील या घटनेत शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.
चंद्रपूरमध्ये शनिवारी दुपारी आलेवाही रेल्वे स्टेशनजवळच्या खरकाडा जंगलामध्ये तेंदूपत्ता तोडण्यासाठी तेथील गावकरी गेले असता अस्वालाने त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये बिसन कुळमेथे (वय ५५), फारूख शेख (वय ३२), रंजना राऊत (वय ३५) यांचा मृत्यू झाला. हल्ला एवढा भयानक होता की, त्यानंतर काही जणांचे चेहरेही ओळखता येत नव्हते. या घटनेमुळे येथील गावकरी हादरले आहेत.
नंतर संतप्त गावकऱ्यांनी नरभक्षक अस्वलाचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी वनअधिकाऱ्यांकडे केली. ग्रामस्थांच्या रोषानंतर अखेर गोळी घालून या अस्वलाला वनअधिकाऱ्यांनी ठार केले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे.