तिवसा - हैदराबाद विद्यापीठातील आंबेडकरी संशोधक विद्यार्थी रोहित वेमुला या विद्यार्थ्याने रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या भाजप सरकारच्या निषेधार्त बुधवारला (दि. २०) शहरात बंद पुकारण्यात आला होता. या बंददरम्यान शाळा, महाविद्यालये बाजारपेठ येथे कडकडीत बंद ठेवण्यात आले. प्रकरणाचे शहरात तीव्र पडसाद उमटले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा मंचाच्या वतीने बंदची हाक देण्यात आली होती.
बुधवारी सकाळपासून शहरात सर्वत्र शांतता दिसून येत होती. गल्ली बोळ, मुख्य रस्त्यावरील सर्व दुकाने बंद होती. विद्यार्थीही स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभागी झाले होते. नागरिकांनीही बंदला प्रतिसाद दिला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने रोहितला वसतिगृहातून निलंबित करण्याची मागणी केली होती. त्याच्या निलंबनाबाबत केंद्रीय मंत्री बंडारी दत्तात्रेय यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांना पत्र लिहिले होते.
केंद्र सरकार मंत्र्यांच्या शारीरिक तसेच मानसिक त्रासाने कंटाळून जाऊन रोहितने आत्महत्या केली. यासंदर्भात भातकुलीचे एसडीओ जगताप यांना निवेदन देण्यात आले. दुपारी निषेध सभेदरम्यान केंद्र शासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या वेळी संघटनेचे कार्याध्यक्ष राज माहोरे, सूरज दहाट, सागर भवते, प्रशीक मकेश्वर यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देताना प्रकाश सोनोने, भूषण यावले, धनराज थेल, महादेव गारपवार, जानराव मनोहरे, अभिषेक मनोहरे, शरद वानखडे, मनोज यावले, ओमप्रकाश वाघमारे, सुभाष गाडेकर, विनोद थूल, आशिष ढोले, नीलेश माहोरे, धर्मपाल सोनटक्के, पिंटू बनसोड, सूरज मकेश्वर, अनिल मकेश्वर यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.
मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची केली मागणी
या घटनेसंदर्भात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर अॅट्रॉसिटी कायदा नोंदवून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.