नागपूर - जेएनयू प्रकरणात केंद्र सरकारची भूमिका संभ्रमित करणारी राहिलेली असून त्यापायी दहशतवादी गटांना आपण एकत्र येण्याची संधी देत आहोत, अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी नागपुरात बोलताना केली. जेएनयूमधील घोषणाप्रकरणी विद्यार्थ्यांवर केंद्र सरकारने देशद्रोहाचा आरोप ठेऊन गुन्हे दाखल केले आहेत. तर दुसरीकडे अफजल गुरूला हिरो म्हणविणाऱ्या मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या पीडीपी पक्षाशी युती करून भाजप सत्तेत सहभागी होतो. त्यामुळे भाजपचा हा कुठला राष्ट्रवाद आहे? असा प्रश्न उपस्थित करून आंबेडकर म्हणाले, केवळ घोषणा देणे देशद्रोह ठरत नाही. सरकारच्या विरोधात उठाव हा देशद्रोह ठरतो. त्यामुळे सरकारने त्यावर खुलासा करण्याची गरज आहे.
रोहित वेमुला प्रकरणातही सरकारची भूमिका संभ्रमित करणारीच आहे. त्याची आई अनुसुचित जातीची व वडील ओबीसी आहेत. पती-पत्नी विभक्त असताना मुलगा आईजवळ राहात असेल तर तिची जात त्याला लागू पडते, असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. पाकिस्तानबाबत मोदींची बॅकडोअर डिप्लोमसी अपयशी ठरली असून अमेरिकेने त्यांना विमाने देऊन त्याला छेद दिला आहे. हे अपयश झाकण्याठीच जेएनयूचा मुद्दा पुढे केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
व्यवस्थेवर संघाने जाहीर चर्चा करावी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देशात स्वत:ची व्यवस्था आणायची असेल तर त्यांनी ती लपून छपून आणू नये. त्यावर जाहीररित्या चर्चा करून ती आणावी. लोकांना ती मान्य असेल तर ठीक नाही तर ते फेटाळून लावतील. संघ देशातील वातावरण दुषित केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.