सोलापूर - भारत खंडात अखंड वेदपठण चालू असल्याने भारत हा अध्यात्ममार्गी देश बनला आहे. वेदोच्चार आणि धर्माचरण केल्याने बुद्धीला प्रगल्भता येते. त्यातून मानवजाती आणि समाजाचा उद्धार होतो, अशी उदात्त भावना ठेवून सुमारे १०० वर्षांपूर्वी भांडे गल्ली परिसरात भावसार क्षत्रिय समाजातील काही धुरिण एकत्र आले. त्यांच्या पुढाकारातून श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिराची उभारणी करण्यात आली. यंदा मंदिराचे शंभरावे वर्ष आहे. त्यानिमित्ताने मे पासून मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मे रोजी श्रींचा कल्याणोत्सव कार्यक्रम होणार आहे.
वैशाख वद्य पंचमी शके १८३७ रोजी कै. धोंडिबाआण्णा खमितकर (रा. शाहबाद) यांनी भांडे गल्लीतील जागा खरेदी केली. समाजातील ६० मंडळींनी मिळून मंदिराची स्थापना केली. परंपरेने पूजा, अर्चा, उत्सव होत आहे. त्यामुळे मंदिर आज समस्त समाजाचे श्रद्धास्थान बनले आहे.
भविष्यातील गरज ओळखून १९५६ मध्ये मंदिराचे विश्वस्त (कै.) विष्णूपंत ढगे, गणपत निकते नारायणराव निकते यांनी मंदिराच्या मागील जागा खरेदी केली. तसेच २००३ मध्ये मंदिराचे विश्वस्त (कै.) सुहास रेळेकर, (कै.) रमाकांत बुवा ढगे इतर विश्वस्तांनी लगतची जागा खरेदी करून अखंड केली. समाजाची गरज ओळखून उद्योजक किशोर कटारे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर जीर्णोद्धाराचा संकल्प करण्यात आला. ३० जून २००७ रोजी मंदिराची पायाभरणी झाली. अवघ्या आठ महिन्यांत पल्लवशाली मंदिराची उभारणी करून समाजाने एक विक्रम केला. तसेच २७ मार्च २००८ रोजी मोठा उद्घाटन समारंभ झाला. मंदिराला कायमस्वरूपी आर्थिक उत्पन्नाचा स्रोत असावा यासाठी मंदिराच्या दर्शनी भागात सर्व सोयींनी युक्त पाच मजली शॉपिंग सेंटर समाजबांधवांच्या सहकार्याने उभारण्यात आले. मंदिराला मे २०१५ रोजी १०० वर्ष पूर्ण होत आहेत.
सध्या ट्रस्टच्या अध्यक्षस्थानी विद्या कटारे असून श्रीकांत निकते, बाळासाहेब जवळकर, सुनील अण्णे, सुधाकर वायचळ, विशाल रेळेकर, मोहनराव माळवदकर, रविकिरण सुत्रावे, सुरेश कांबळे, रमेश भांबुरे, श्रीमती सुमन ढगे ही विश्वस्त मंडळी कामकाज पाहात आहेत.