आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर- सिध्दिबागेजवळील महापालिकेच्या जलविहारातील पाणी मागील काही दिवसांपासून खराब झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली होती. यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ने मंगळवारी (7 मे) वृत्त प्रसिध्द करताच तलावातील पाणी तातडीने स्वच्छ करण्यात आले. शुक्रवारपासून तलाव पूर्ववत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती ठेकेदार मनसुख वाबळे यांनी गुरूवारी दिली.
मनपा व ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे जलविहाराची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे पोहण्यासाठी येणार्यांची ऐन उन्हाळ्यात गैरसोय झाली होती.
तलावातील फिल्टर प्लँट, क्लोरिन प्लँट व अंडरवॉटर प्लँटची उपकरणे जवळपास चार दशकांपूर्वीची असल्याने त्यांची कार्यक्षमता संपली आहे. त्यामुळे ही उपकरणे बदलावीत, अशी मागणी ठेकेदाराने मनपाकडे केली आहे. परंतु प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने तलावातील सोयी-सुविधांचा बोजवारा उडाला आहे. फिल्टर प्लँट नादुरूस्त झाल्याने मागील दहा-बारा दिवसांपासून तलावातील पाणी खराब झाले होते. यासंदर्भात काही नागरिकांनी तक्रार केल्यानंतर ‘दिव्य मराठी’ने जलविहाराच्या समस्या व त्याकडे मनपाचे होत असलेले दुर्लक्ष याबाबत वस्तुस्थिती मांडली होती.
तलावासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी ठेकेदाराने मनपाकडे केली होती. मात्र, सध्या सुरू असलेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर मनपाने पाणी देण्यास नकार दिला. त्यामुळे दोन दिवसांपासून तलाव बंद करण्यात आला होता.
मनपाचे सहकार्य मिळत नसल्याने अखेर ठेकेदाराने स्वखर्चाने फिल्टर प्लँटची दुरूस्ती करून तलावातील पाणी स्वच्छ केले. त्यासाठी सुमारे 50 हजार खर्च आला. तलाव काही दिवस बंद ठेवण्यात आल्याने सुमारे 10 हजारांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे मनपाने भाडे माफ करावे अथवा झालेला खर्च द्यावा, अशी मागणी ठेकेदाराने मनपाकडे केली आहे.
पाणी स्वच्छ करण्यात आल्याने तलाव शुक्रवारपासून पूर्ववत सुरू होणार असल्याचे ठेकेदार वाबळे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.