आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय जनता पक्षाला जिल्ह्याचा कारभारी मिळेना, आठ महिन्यांनंतरही जिल्हाध्यक्षपद रिक्त

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जिल्ह्यात एक खासदार आणि पाच आमदार असतानाही भारतीय जनता पक्षाचा जिल्हाध्यक्षपदाचा शोध संपायला काही तयार नाही. लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणूकही पक्षाने जिल्हाध्यक्षाविना लढवली. राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर आता जिल्हाध्यक्षपदाचा विषय मार्गी लागण्याची शक्यता असून, माजी आमदार चंद्रशेखर कदम व माजी नगरसेवक शिवाजी लोंढे यांच्यापैकी एकाला हे पद मिळणार असल्याची चर्चा आहे.
भाजपचे खासदार दिलीप गांधी यांच्या उमेदवारीवरून नाराज झालेले अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आली. ढाकणे यांची नाराजी दूर करण्याचा ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांनी प्रयत्न केला, मात्र त्यात यश आले नाही. तेव्हापासून रिक्त असलेले जिल्हाध्यक्षपद विधानसभा निवडणुकीतही रिक्त होते. लोकसभा निवडणुकीनंतर जिल्हाध्यक्षपदाचे नाव जाहीर केले जाईल, असे खासदार गांधी यांनी सांगितले होते. पण आठ महिने उलटूनदेखील पक्षाला जिल्हाध्यक्षपद नियुक्त करता आलेला नाही.
जिल्ह्यात भाजपचे खासदार गांधी यांच्यासह राम शिंदे, शिवाजी कर्डिले, मोनिका राजळे, स्नेहलता कोल्हे व बाळासाहेब मुरकुटे असे पाच आमदार आहेत. असे असतानाही भाजपला जिल्हाध्यक्षविना रहावे लागले आहे. जिल्हाध्यक्षपदासाठी माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगण्यात येत होते. तथापि, कदम हे पक्षाच्या कुठल्याही आंदोलनांना अथवा बैठकांना उपस्थित नसतात. त्यामुळे त्यांच्या नावाला एका गटाचा विरोध झाल्याने नावाची घोषणा रखडली.
जिल्हाध्यक्षपदासाठी माजी नगरसेवक शिवाजी लोंढे हेही इच्छुक आहेत. दिल्लीतील एका वरिष्ठ नेत्याने त्यांना विधानसभा निवडणुकीतही तसा शब्द दिला होता. त्यामुळे लोंढे जिल्हाध्यक्षपदाच्या रेसमध्ये आले आहेत. खासदार गांधी हे आपले चिरंजीव सुवेंद्रसाठी आग्रही असले, तरी भाजपतील जुन्या लोकांचा सुवेंद्रला विरोध आहे. गटातटाच्या राजकारणात आणखी वाद वाढवण्याऐवजी जिल्हाध्यक्षपद रिक्त ठेवण्याची भूमिका प्रदेशने घेतली आहे.