नगर- विधानसभा निवडणूक निर्भय आणि शांततेच्या वातावरणात पार पडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल कवडे यांनी केले.
जिल्हा नियोजन भवनात निवडणूक निर्णय अधिकारी व पोलिस अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत कवडे बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक लखमी गौतम, अतिरिक्त जिल्हाधिकारी शरद जाधव, उपजिल्हाधिकारी दत्तात्रेय बोरुडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील माळी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, सुनीता ठाकरे आदी उपस्थित होते. कवडे म्हणाले, आचारसंहितेचे उल्लंघन व अवैध प्रचाराच्या घटना रोखण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय भरारी पथके कार्यरत आहेत. अवैध खर्च होऊ नये, तसा होत असल्यास तो तत्काळ थांबवला जाऊन उचित कायदेशीर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणा आहे. जिल्हास्तरावर खर्च देखरेख कक्ष आहे. सर्व भरारी पथकांनी, यंत्रणांनी सतर्क रहावे. दूरचित्रवाहिन्या व केबल नेटवर्कवरील जाहिरातींची तपासणी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीकडून होणे आवश्यक आहे. त्या-त्या मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहिरातींच्या सीडी शिफारशीसह जिल्हास्तरीय माध्यम समितीकडे पाठवाव्यात, अशी सूचनाही कवडे यांनी दिली.