श्रीगोंदे - येथील पोलिस ठाणे निरनिराळ्या कारणांनी नेहमीच चर्चेचा विषय बनते. मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास तब्बल तासभर पोलिस ठाण्यात ठाणे अंमलदारासह सर्वच कर्मचारी अनुपस्थित होते. एक महिला कर्मचारी अपवाद वगळता सर्वच खुर्च्या रिकाम्या होत्या. त्यामुळे कामानिमित्त आलेल्या नागरिकांना ताटकळत बसावे लागले.
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह सर्वच स्टाफ ‘बाहेर’ असल्याने पोलिस ठाण्यात शांतता पसरली होती. मंगळवारी पहाटे ढोकराई माळ येथे दोन ठिकाणी चोरी झाली. याबाबत खबर देण्यासाठी ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यात सकाळी सहाच्या सुमारास दोनदा फोन केला असता ग्रामस्थांच्या फोनला प्रतिसाद मिळाल्याची माहिती समजली.
श्रीगोंदे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्ह्यांचा आलेख उंचावत चालला आहे. तुलनेने तपासात पोलिस प्रशासनाला अपेक्षित यश मिळत नसल्याचे चित्र आहे. तालुक्यात चोऱ्या, दरोड्यांचे सत्र सुरूच आहे. आक्रमक कार्यशैलीद्वारे ठसा उमटवणारे पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार ही आव्हाने कशी हाताळतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
श्रीगोंदे पोलिस ठाण्याचे मंगळवारी दुपारचे चित्र.