आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोल्हापूर - 31 जानेवारी 2014 पूर्वी कोल्हापूर सर्किट बेंचबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांनी मंगळवारी दिले. त्यामुळे गेले 54 दिवस कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांत सुरू असलेले वकिलांचे काम बंद आंदोलन मागे घेण्यात आले.
कोल्हापूर येथे खंडपीठ व्हावे यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सोलापूर जिल्ह्यातील 6 तालुक्यांतील वकिलांनी 54 दिवसांपूर्वीपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले होते. यामुळे य सर्वच न्यायालयातील कोट्यवधी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले तसेच शासकीय महसूलही बुडत होता. दरम्यान, मुख्यमंत्र्यांशी तीन ते चार वेळा चर्चा झाल्यानंतर खंडपीठाऐवजी सर्किट बेंचचा प्रस्ताव पुढे रेटण्यात आला. त्याला वकिलांनी सहमती दर्शवली. या विषयावर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांशी चर्चाही झाली, परंतु आधी संप मागे घ्या, असा आग्रह न्यायालयाने धरला तर वकीलही भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे चर्चा फिसकटली होती.
मंगळवारी कोल्हापूर खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक अॅड. शिवाजीराव राणे, अॅड. धैर्यशील पाटील यांच्यासह या सहाही जिल्ह्यातील 18 वकिलांच्या शिष्टमंडळाने न्यायाधीश मोहित शहा यांच्याशी चर्चा केली. या वेळी ‘काम बंद आंदोलन मागे घेतल्याशिवाय सर्किट बेंचबाबतची प्रक्रिया पुढे कशी सुरू करायची?’ असा सवाल शहा यांनी उपस्थित केला. दोन्ही बाजूंच्या चर्चेनंतर शहा यांनी ‘आपण स्वत: दिवाळीनंतर कोल्हापूरचा दौरा करू. तसेच जानेवारीपूर्वी सर्किट बेंचबाबत सकारात्मक निर्णय घेऊ’, अशी ग्वाही दिली. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.