आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासातारा - बाटलीभर पाणी काढण्यासाठी विहिरीत उतरलेल्या दोन तहानलेल्या बालिकांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रायक घटना बुधवारी औंध (ता. खटाव) येथे घडली. पाणीटंचाईने दोन बालिकांचा बळी घेतला आहे.
औंध येथील मूळपीठ डोंगराच्या पायथ्याशी एक छोटी वस्ती आहे. याच ठिकाणी लक्ष्मी होलराम जयस्वाल (वय 11) ही मुलगी आपले मामा भाऊसाहेब रणदिवे यांच्याकडे राहत होती. प्रतीक्षा कीर्तिकर (वय 10) ही मुलगीसुद्धा चार दिवसांपूर्वी या वस्तीवर आपल्या मामाकडे आली होती. बुधवारी लक्ष्मी जनावरांना चारण्यासाठी शेरी शिवारात गेली होती. प्रतीक्षाही तिच्यासोबत गेली होती. दुपारी साडेतीनच्या सुमारास तहान लागल्याने दोघी जवळच असलेल्या मारुती मंदिरामागील विहिरीत पाणी काढण्यासाठी उतरल्या होत्या. बाटली भरत असताना एकीचा पाय घसरल्याने ती पाण्यात पडली व तिला वाचविण्यासाठी दुसरीही पाण्यात उतरली. मात्र दोघींचाही बुडून मृत्यू झाला. दरम्यान, नातेवाइकांनी. शेरी शिवारातील विहिरीजवळ शोध घेतला असता पाण्यात दोघी तरंगताना दिसल्या. औंध रुग्णालयातील डॉक्टरांनी त्या मुलींना तपासून मृत घोषित केले.
गावी जाण्यापूर्वीच काळाचा घाला
लक्ष्मी आपल्या मामीबरोबर गावी जाणार होती, परंतु तत्पूर्वीच काळाने तिच्यावर घाला घातला. खटावच्या तहसीलदार वैशाली राजमाने यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. या कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.