कोल्हापूर- ‘नारायण राणे भाजपमध्ये आल्यास त्यांचं स्वागतच आहे.’ असे वक्तव्य महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. नारायण राणे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा गेल्या काही दिवस सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांचं हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.
सदाभाऊ खोत यांचे मंत्रिपद काढून घेण्यापेक्षा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एनडीएमध्येच राहण्याचा निर्णय घेतल्यास राज्यात त्यांना आणखी एक मंत्रिपद देण्याचा विचार सुरु आहे.’ असे वक्तव्य करत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राजू शेट्टींना चुचकारण्याचा प्रयत्न केला. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते. याचवेळी बोलताना चंद्रकात पाटील यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची पाठराखण केली आहे. ‘सदाभाऊ खोत यांचं काम चांगलं आहे आणि ते सध्या मुख्यमंत्री कोट्यातून मंत्री आहेत.’ अशी माहिती चंद्रकांत पाटलांनी दिली.