सातारा - मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा यासाठी रंगनाथ पठारे समितीची स्थापना झाली आहे. केंद्र शासनाच्या साहित्य अकादमीकडे तशी मागणीही केली आहे. मराठी भाषा दिनापूर्वी हा दर्जा मिळावा यासाठी लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न व्हावेत, त्यांनी ते पूर्ण ताकदीने करावे यासाठी जनतेने साहित्य अकादमीला पत्रे पाठवावीत, असे आवाहन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तरच भाषेच्या विकासासाठी तसेच संशोधनासाठी अधिक निधी उपलब्ध होईल. मराठी भाषा दिन २७ फेब्रुवारीला साजरा होतो. त्यापूर्वी हा दर्जा मिळावा यासाठी व्यापक प्रयत्न अपेक्षित आहेत. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, अशी मागणी करणारी पत्रे लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांनी, मराठी भाषकांनी साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या नावाने दिल्ली येथे पाठवावीत, ईमेल पाठवले तरी चालतील,असे आवाहन तावडे यांनी केले आहे. मराठी भाषा विभाग व
आपण स्वत: मराठी दिनापूर्वी अभिजात दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे तावडे म्हणाले.