सांगली - ‘कालपर्यंत दरोडेखोर वाटणारे, आज तुमचे गुरू कसे झाले? ’ असा सवाल मुख्यमंत्र्यांना करतानाच ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेमुळे तुम्ही सत्तेत आला आहात हे विसरू नका. लुटारुंचा हात धरून तुम्ही सत्ता चालवणार असाल तर तुम्हालाही रस्त्यावर आणू’, असा खणखणीत इशाराही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी सांगलीत युती सरकारला दिला.
पुण्यात मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत साखर परिषद घेतली. मात्र शेतकरी संघटनेच्या एकाही प्रतिनिधीला बोलावले नव्हते. त्याला उत्तर देण्यासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेने रविवारी सांगलीत साखर परिषद आयोजित केली होती. यात त्यांनी शासनाच्या साखर परिषदेवर हल्ला चढवला. ‘‘वसंतदादा शुगर इन्स्टीट्युट ही शेतक-या ंच्या पैशांवर चालते. आम्ही क्विंटलमागे अडीच रुपये या संस्थेला देतो. पण या संस्थेने आजवर ऊस उत्पादन वाढीसाठी, उसावर आलेल्या रोगांचे निराकरण करण्यासाठी काय केले? ही संस्था म्हणजे शरद पवारांची मर्जी सांभाळलेल्या अधिका-या ंचा ‘वृद्धाश्रम’ झाला आहे. परवाच्या साखर परिषदेत साखर कारखानदारीचा पुढील दहा वर्षांचा रोडमॅप ठरवण्यासाठी सरकारने समिती नेमली. मुळात या रोडमॅपमध्ये ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी मजूर यांच्यासाठी काय आहे, हे सहकारमंत्र्यांनी सांगावे,’ असा सवालही शेट्टींनी केला.
पुढे वाचा, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांवर टीका करताना शेट्टी म्हणाले
माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांवर टीका करताना शेट्टी म्हणाले, ‘ऊस उत्पादक शेतक-यांना पवारांनी खड्ड्यात घातले. साखर कारखानदारीत कार्पोरेट कंपन्या येत असताना पवारांनी त्यांना थोपवले. या क्षेत्रात मोठ्या कंपन्या आल्या असत्या तर उसाला चांगला दर मिळाला असता; पण पवारांना ते नको होते. आम्ही गेली १५ वर्षे संघर्ष करून एफआरपीपर्यंत पोहोचलो आहोत आणि आता हे कारखानदार एफआरपी कमी केला पाहिजे म्हणत आहेत. हे आम्ही कदापि होवू देणार नाही. त्यासाठी प्रसंगी रक्त सांडायची तयारी ठेवा,’ असा इशाराही खासदार शेट्टींनी दिला.
गडकरी साहेब तुम्ही साखरेच्या भानगडीत पडू नका : शेट्टी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरही शेट्टींनी हल्लाबोल केला. ते म्हणाले,‘‘गडकरीसाहेब, या साखरेच्या भानगडीत तुम्ही पडू नका. रस्ते करायचे तुमचे काम आहे, तेच करा. नाहीतर विदर्भातल्या साखर कारखान्यांमध्ये तुम्ही काय दिवे लावलेत, ते आम्हाला बाहेर काढावे लागेल.’
‘ते’ पुरावे रद्दीत घातले काय?
‘‘विरोधी पक्षात असताना भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नागपूरला हिवाळी अधिवेशनावेळी भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात तत्कालन सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जिल्हा बँकांपासून विविध संस्थांमध्ये केलेल्या भानगडींचे ट्रॅक्टरभर पुरावे सोबत आणले होते. आता हे पुरावे कुठे गेले, की रद्दीत घातले, याचे उत्तर फडणवीस यांनी द्यावे’’ असे आव्हान शेट्टी यांनी दिले.
‘एफआरपी’साठी मंत्र्यांच्या गाड्या अडवा
एफआरपीनुसार साखर कारखान्यांना दर देण्यासाठी भाग पाडण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांची आहे, याची जाणिव करून देताना शेट्टी म्हणाले, ‘‘साेमवारपासून प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांची गाडी अडवून त्यांना जाब विचारा. त्यातूनही दर मिळाला नाही तर २१ मे रोजी सर्व तहसील कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करू.’