आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर - अार्थिक व दुर्बल घटकातील पाल्यांसाठी आरटीइ प्रवेशाची पहिली सोडत निघाली. मात्र शाळांकडून पात्र विद्यार्थ्यांची अडवणूक केली जात आहे. प्रवेश घेण्यासाठी दोन ते तीन दिवसांनी या, कोर्टात केस चालू आहे, २५ टक्के प्रवेश देणे बंधनकारक नाही, असे सांगत वेळ मारून नेण्याचा प्रकार केला जात आहे. यामुळे पालकांची कुचंबना होत आहे.
मंगळवारी आरटीई प्रवेशाची सोडत निघाली. ८६७ जणांची पहिली यादी प्रसिद्ध झाली. त्यानुसार आवश्यक ती कागदपत्रे घेऊन वेळेत प्रवेश घ्या, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. आरटीई प्रवेशासाठी शहरातील २१ शाळा पात्र आहेत. बहुतांश शाळांमध्ये पालकांची दिशाभूल करणारी उत्तरे दिली जात आहेत. याबाबत माहिती घेण्यासाठी प्रशासन अधिकारी यांच्याशी संवाद केला असता त्यांच्याशी संपर्क झाला नाही.
फलकावरील माहिती
मागील पाच- सहा वर्षाच्या कालावधीत शाळांनी दिलेल्या आरटीई प्रवेशांचा फी परतावा शासनाने अदा केलेला नाही. तरी पालकांनी शालेय व्यवस्थापनाशी किंवा कर्मचाऱ्यांशी वाद घालू नये अथवा दबाव आणू नये, अशी नोटीस फलकावर लावली आहे.
पालकाची प्रतिक्रिया
आरटीई निवड यादीनुसार प्रवेश घेण्यासाठी जुळे सोलापुरातील नामवंत शाळेत गेलो. मात्र प्रवेश देता येत नाही, कोर्टात केस चालू आहे, असे सांगण्यात आले. ही बाब प्रशासनाधिकारी यांना कळवली असता त्यांनी लेखी म्हणणे सादर करण्यास सांगितले. त्यानुसार लेखी तक्रार केली आहे. अन्याय करणाऱ्या शाळांवर योग्य ती कारवाई व्हावी, अशी अपेक्षा एका पालकाने व्यक्त केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.