उस्मानाबाद - शिक्षक मतदार संघातील निवडणुकीमध्ये ५४९७ पैकी ५०९६ शिक्षकांनी जिल्ह्यातून मतदान केले आहे. नैमितिक रजा मंजूर असूनही ४०१ गुरुजींनी दांडी मारल्यामुळे आश्चर्य होत आहे. दरम्यान उस्मानाबाद शहरातील मतदान केंद्रावर लागलेली मोठी रांग पाहून शिक्षकांनी काढता पाय घेतला असल्याचे समजते.
काही राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी शिक्षकांना आणण्यासाठी विशेष फिल्डिंग लावली होती. काही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी मात्र, हात जोडण्यावरच भर दिला होता. शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत शिक्षकच मतदार असल्यामुळे शिक्षक सजगतेने १०० टक्के मतदान करतील अशी अपेक्षा होती. विशेष म्हणजे अन्य निवडणुकांच्या मतदारांमध्ये जागृती करून त्यांच्याकडून मतदान करवून घेण्याची जबाबदारीही शिक्षकांवर असते. यामुळे शिक्षकांकडून पूर्ण मतदानाची मोठी अपेक्षा असते. मात्र, शुक्रवारी (दि. ३) शिक्षक मतदार संघाच्या मतदानासाठी ४०१ जणांनी दांडी मारल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे त्यांना नैमेत्यिक रजा मंजूर करण्यात आली होती. अशी रजा मंजूर असूनही शिक्षक कोठे गेले, याबाबत काही मतदान केंद्रावर चर्चा सुरू होती. आजारपण अन्य मोठ्या अडचणी शिक्षकांना येऊ शकतात. मात्र, इतक्या मोठ्याप्रमाणातील शिक्षकांना अडचणी येथे अशक्य असल्याचीही चर्चा सुरू होती.
रांगापाहून काढता पाय : येथील केंद्रावर दुपारच्या दरम्यान कोणीही फिरकले नाही. मात्र, ३.३० वाजेच्या दरम्यान मोठी गर्दी झाली. सुमारे ३० शिक्षक रांगेत थांबले होते. काही शिक्षण तेथे आले. त्यांनी शिक्षकांची रांग पाहून काढता पाय घेतला. येथील मतदार केंद्रावर ८६४ पैकी ७८७ शिक्षकांनी मतदार केल्याची नोंद आहे.
जिल्ह्यात एकूण ९२.७१ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये महिलांचा टक्का कमी आहे. ८६५ पैकी ७५४ म्हणजेच ८७.१७ टक्के महिला शिक्षकांचे मतदान झाले आहे. पुरुष शिक्षकांची संख्या ४६३२ आहे. त्यापैकी ४३४२ शिक्षकांनी मतदान केले आहे. याचा टक्का ९३.७४ टक्केवर गेला आहे. जिल्ह्यात एकही अपंग मतदार नाही.