सोलापूर- महापालिका अथवा जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळा व्यतिरिक्त कामे लावण्याचा शासनाच्या शिक्षण विभागाकडून सपाटा सुुरू आहे. स्वच्छता पंधरवाडा केला, परंतु कोणत्याचा शाळेत विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विचार केला नाही. विद्यार्थ्यांना ना मास होते ना ग्लोज. राष्ट्रीय काम म्हणून वरिष्ठ स्तरापासून ते स्थानिक पातळीवर कोणीच खबरदारी घेताना दिसत नाही. शिक्षणाधिकारी, प्रशासनाधिकारी यांचे तोंडावर बोट अाहे.
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हागणदारी मुक्ती जनजागृती कार्यक्रम शाळांमार्फत राबविला. परिसर अस्वच्छ करणाऱ्या उघड्यावर शौचालयास बसणाऱ्यांचे प्रबोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांना सकाळच्या वेळीच जुपले होते. बाळे परिसर, देगाव नाका, दमाणी नगर, हद्दवाढ भाग, विजापूर रोड परिसर आदी भागात विद्यार्थ्यांना प्रात:र्विधी करण्यात येणाऱ्या ठिकाणीच उभा केले होते. दुसऱ्या आठवड्यामध्ये विद्यार्थ्यांकडून विविध ठिकाणी स्वच्छता केली. तसे आवाहन पालिका आयुक्तांनी केले होते.
शासनाकडून ठरवण्यात आलेला कार्यक्रम २४ सप्टेंबर रोजी समग्र स्वच्छता, तर २५ सप्टेंबर रोजी सर्वत्र स्वच्छता केली. आता रविवार दि. ऑक्टोबर रोजी श्रेष्ठ स्वच्छता हा उपक्रम शहरातील शाळांमध्ये घेतला, शाळा परिसर स्वच्छ सुंदर ठेवावेत असे परिपत्रक प्रशासनाधिकारी यांनी काढलेले आहे. परंतु विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करणे गरजेचे आहे.