सोलापूर - सोलापूरपासून ४० किलोमीटरपर्यंत सिटीबस सेवा सुरू करण्याची मागणी मनपा परिवहनच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त विजयकुमार काळम पाटील यांच्याकडे केली. ४० किलोमीटरपर्यंत बस सेवा सुरू झाल्यास अक्कलकोट आणि तुळजापूर या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपर्यंत सोलापूर वासियांना सिटीबसने जाता येणार आहे.
परिवहन पदाधिकाऱ्यांच्या आयुक्तांकडे चाळीस िकलोमीटरपेक्षा दूर असलेल्या धार्मिक स्थळांसाठी बससेवा सुरू करावी, चालक भरती करावी, सम्राट चौक परिसरात इंधन पंप सुरू करावा या चार मागण्या आहेत.
आयुक्त आहेत सकारात्मक
चाळीसकिलोमीटरपर्यंत बससेवा सुरू करण्यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याशी बोलून संबंधित अधिकाऱ्यांसोबत येत्या १५ दिवसांत बैठक घेऊ, असे सकारात्मक उत्तर आयुक्तांनी दिले आहे, असे सभापती सलीम सय्यद यांनी सांगितले. परिवहन सदस्य राजेश कलकेरी यांच्या मातोश्री शालिनी कलकेरी यांचे निधन झाल्यामुळे श्रद्धांजली वाहून बुधवारची परिवहन सभा तहकूब करण्यात आली.