सोलापूर - शिवाजी चौकातील वाहतूक यंत्रणा सुधारण्यासाठी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी चार महिन्यांपूर्वी नियोजन केले. महापालिका, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ)ला सूचना दिल्या. तीनदा नियोजन बैठकीचा आढावा घेतला. पोलिस आयुक्त प्रदीप रासकर, उपायुक्त अश्विनी सानप यांनी पाहणी करून काही नियोजन केले. महापालिकेचे अतिक्रमण विरोधी खाते अतिक्रमण काढण्याचे तात्पुरते नाटक करते. पोलिसांनीही नव्याचे नऊ दिवस याप्रमाणे काम केले. त्यामुळे पुन्हा स्थिती ‘जैस-थे’च आहे.
असेनियोजन होऊ शकते
शिवाजीचौकात उड्डाणपूल पाहिजेच. ते काम पूर्ण होईपर्यंत जुना पुणे नाका ते शिवाजी चौक आणि सरस्वती चौक या मार्गावर दुभाजक पाहिजेत. हॉटेल अॅम्बेसिडर ते शिवाजी शाळा, कल्पना टॉकीज हा रस्ता खराब झाला असून डांबरीकरण पाहिजे. नंतर पर्यायी वाहतूक वळविता येईल.
शिवाजी चौकातील अतिक्रमण हटविणे गरजेचे आहे. फूटपाथला दोन्ही बाजूंनी जाळी पाहिजे. चौकातील अपेरिक्षा, खासगी बस, प्रवासी वाहतूक जीप यांना थांबा देऊ नये. सिटीबस तीन आसनी रिक्षांना ठरावीक ठिकाणी थांबा आणि बॅरीकेडिंगची सोय पाहिजे. नवीवेस पोलिस चौकी ते शिवाजी चौक वन-वे पाहिजे. सरस्वती चौक ते शिवाजी चौक आणि पुणे नाका या मार्गावर आणखी नियोजन करून दुभाजक उभारणे, वाहने पर्यायी मार्गावरून वळविणे असे नियोजन पाहिजे.
पोलिसांची मानसिकता आणि कामाची पद्धत
वाहतूकपोलिसांवर वरिष्ठांचा धाक नाही. पाॅइंट दिलेल्या ठिकाणी पोलिस नुसते थांबून असतात. शिटी मारण्याची तसदी घेत नाहीत. वाहतूक बूथ नावालाच आहे. अॅपेरिक्षा, रिक्षा बेशिस्त थांबतात. त्यांच्यावर कारवाई होत नाही. कोण शिस्त मोडत असेल तर गाडी जप्त करून न्यायालयात खटला दाखल करा. पोलिसांनी सक्षमपणे आणि कायद्याचा अंमल काय असतो हे बेशिस्त वाहनचालकांना दाखवून दिल्यास कुणाची शिस्त मोडण्याची हिंमत होणार नाही. कामात सुधारणा अपेक्षित आहे. सहायक पोलिस आयुक्त पोलिस निरीक्षक यांना वारंवार विचारले की ते म्हणतात, नियोजन सुरू आहे. शिस्त लावू, पाहणी करतो, चौकशी करतो हीच उत्तरे देतात. प्रत्यक्षात नियोजन पाहिजे.