नवी दिल्ली - टूजी स्पेक्ट्रम वाटप प्रकरणातील मुख्य आरोपी माजी दूरसंचारमंत्री ए. राजा यांचा जबाब दिल्ली न्यायालयाने सोमवारी नोंदवला. सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ओ. पी. सैनी आणि राजा यांच्यामध्ये थेट संभाषण झाल्याचे सांगण्यात येते.
आरोपीचा जबाब नोंदवला जाईल. न्यायाधीश आणि आरोपीमधील हे थेट संभाषण असेल. उत्तर द्यावयाचे की नाही याचा पर्याय आपण स्वीकारावा, असे न्यायाधीशांनी सांगितले. राजा, द्रमुक खासदार कनिमोझी यांच्यासह 16 आरोपींना 1,718 प्रश्नांची प्रश्नावली पाठवण्यात आली होती. त्यानंतर न्यायाधीश-आरोपीमध्ये थेट संभाषण झाले. दरम्यान, एस्सार ग्रुप आणि लूप टेलिकॉमच्या प्रवर्तकांचे जबाब 19 मेपर्यंत लांबणीवर टाकण्यात आले आहेत.
एस्सार ग्रुपचे प्रवर्तक रवी रुईया आणि अंशुमन रुईया, लूप टेलिकॉमचे प्रवर्तक किरण खैतान, त्यांचे पती आय. पी. खैतान तसेच एस्सार ग्रुप संचालक विकास सराफ यांच्यासह लूप टेलिकॉम, लूप मोबाइल इंडिया लि. आणि एस्सार टेली होल्डिंग लि. फर्म्स या खटल्याला सामोरे जात आहेत. टूजी घोटाळ्यात सीबीआयने ठेवलेले आरोप वरील सर्वांनी फेटाळले आहेत.