आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली - नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाविरोधात संघर्ष करणाऱ्या ग्रामस्थांना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पाठिंबा दर्शवत ग्रामस्थांच्या संघर्षाबद्दल सहानुभूती व्यक्त केली. तसेच प्रकल्पासाठी सुपीक व भरपूर उत्पन्न देणाऱ्या जमिनी का घेतल्या जात आहेत? असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे.
नाणार रिफायनरीविरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमवेत दिल्ली येथे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. या बैठकीत काँग्रेस अध्यक्षांनी या प्रकल्पाला होणाऱ्या विरोधाची आणि कारणांची माहिती घेतली. प्रकल्पविरोधी कृती समितीचे अध्यक्ष अशोक वालम व इतर सदस्यांनी याबद्दलची पार्श्वभूमी स्पष्ट करताना सदर गावात जवळपास आंबे, काजू, नारळ, सुपारी, साग, बांबू इत्यादींची सहा कोटी झाडे असून सभोवती पश्चिम घाटाचा भागदेखील येतो, असे सांगितले. प्रकल्पामुळे ५० हजार लोक विस्थापित होणार आहेत. हा प्रकल्प हा पर्यावरणासाठी घातक आहे, असेही सांगितले. त्यावर काँग्रेस अध्यक्षांनी सुपीक जमीन का घेतली जात आहे? असे सांगत या प्रकल्पाला होणाऱ्या विरोधाला राहुल गांधींनी पाठिंबा दर्शवला.
भाजप, शिवसेनेकडून होतेय फसवणूक
शिवसेना व भाजप हे दोन्ही पक्ष आम्हाला फसवत असून राज्य सरकार जनतेच्या भावनांशी खेळत आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले. त्यावर राहुल गांधी यांनी तत्काळ अशोक चव्हाण, विखे पाटील यांना प्रकल्पाच्या ठिकाणी जाण्याची सूचना केली. त्यानुसार अशोक चव्हाण २ मे रोजी नाणार येथे जाणार असून ते स्थानिकांशी संवाद साधणार आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.