नवी दिल्ली- या ना त्या मुद्द्यावरुन कायम सरकारवर टीका करणारे आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद
केजरीवाल यांनी आज चक्क पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांचे तोंड भरुन कौतुक केले. मोदी प्रभावी वक्ते आहेत. पण जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात जरा कमी पडतात, असेही ते म्हणाले.
केजरीवाल यांनी मोदींच्या विरुद्ध
लोकसभा निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांनी मोदींवर चांगलेच तोंडसुख घेतले होते हे विशेष.
यासंदर्भात
अरविंद केजरीवाल म्हणाले, की नरेंद्र मोदी यांनी देशात सकारात्मक वातावरण तयार केले आहे. पण जनतेला दिलेली आश्वासने ते पूर्ण करतात, की नाही हे वेळच ठरवेल. मोदी प्रभावी वक्ते आहेत. ते चांगल्या बाबी भाषणात मांडतात. पण आश्वासनांची पूर्तता करीत नाहीत. लोकांच्या आकांषा पूर्ण करण्यात ते कितपत यशस्वी होतात हे बघावे लागेल. देशात मोठे बदल होतील, असे जनतेकडून व्यक्त जात आहे. याबाबत लोकांच्या मोदीकडून खुप अपेक्षा आहेत. पण अद्याप काहीच बदल झालेले नाहीत असेही लोक म्हणतात.
कॉंग्रेसप्रणित संपुआ सरकारबाबत बोलताना केजरीवाल म्हणाले, की गेल्या सरकारने काहीच केले नाही. नकारात्मक गोष्टीत सरकार गुंतून पडले होते. भ्रष्टाचार आणि महागाई यात हे सरकार बरबटले होते. आता नवीन सरकार आले आहे. लोकांच्या खुप अपेक्षा आहेत.